अलिबाग : बालविवाहासंदर्भात रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. जिल्ह्यात वर्षभरात 237 कुमारी माता झाल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यात 15 ते 18 वयोगटातील 229 आणि 14 वर्षांखालील 8 अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील बालविवाह प्रथेचे धक्कादायक वास्तव पुन्हा समोर आले आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यांत अल्पवयीन मुलींच्या गर्भधारणेचे प्रमाण अधिक आहे. मुंबईलगत रायगडमध्ये दोन वर्षांत बालविवाहाप्रकरणी 12 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र यंत्रणांच्या नजरेआड होणाऱ्या बालविवाहांचे प्रत्यक्षात जास्त असल्याची चर्चा आहे.
रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयात वर्षभरात 237 अल्पवयीन मुलींना मातृत्व मिळाले आहे. याचाच अर्थ दर महिन्याला 20 अल्पवयीन मुली माता होत आहेत. यातील सर्वाधिक कुमारी माता आदिवा समाजातील आहेत. शिक्षणाचा अभाव, गरिबी आणि रोजगारासाठी स्थलांतर यामुळे आदिवासी समाजात बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कामासाठी स्थलांतर करताना मुलींची गैरसोय होऊ नये म्हणून तिचे लवकर लग्न लावले जाते.
जिल्हा रुग्णालयात कमी वयाच्या मुली प्रसुतीसाठी दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहे. यात आदिवासी मुली जास्त आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी दिली. कायद्याची कडक अंमलबजावणी करतानाच आदिवासी समाजाचे प्रबोधन करण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी व्यक्त करत आहेत. लहानपणी विवाह केल्यास मुलींच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतात. लवकर गर्भवती होणे, कुपोषित बालक, बालमृत्यू अशा समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते.
व्यापक जनजागृती करणार
बालविवाह तसेच अल्पवयीन मुलींची गर्भधारणा रोखण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याची मोहीम सुरू केली जाईल.
– आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री
प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू
लवकरच महिला व बालविकास विभाग, एकात्मिक आदिवासी प्रकल्प संचालक कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकीत हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
– किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड
(Edited by Avinash Chandane)