भिवंडी । भिवंडी लोकसभा मतदारसंघात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या गुन्हेगारी बरोबरच शहरात अवैध ड्रग्स व्यवसाय देखील फोफावला आहे. या अवैध ड्रग्स माफियांमुळेच शहर आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. या गुन्हेगारांवर आणि ड्रग्ज माफियांवर कठोर कारवाई करावी, या संदर्भात भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे गुरुवारी भेट घेतली.या भेटीदरम्यान येथील गुन्हेगार आणि ड्रग्स माफियांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी खासदार बाळ्या मामा यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.
लोकसभा मतदारसंघातील वाढत्या गुन्हेगारीविषयी म्हात्रे यांनी संसदेत आवाज उठवला होता. त्यानंतर पोलीस यंत्रणेने काही गुंडांवर अटक करून कारवाई केली. तसेच ऑगस्ट २०२४ मध्ये गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने भिवंडी शहरात मोठी कारवाई करून ८०० कोटी रुपये किमतीचा ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रगचा साठा जप्त करून दोघा जणांना अटक केली आहे. मात्र या दोन आरोपींपर्यंतच ही कारवाई थांबली असून या दोघा आरोपींच्या मागे सूत्रधार कोण आहेत? याचा तपास करावा, गुजरात एटीएसच्या कारवाई नंतरही शहरात अवैध ड्रग्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात आजही सुरूच असून शहरातील ड्रग्स माफीये आणि त्यांच्या सूत्रधारांवर कारवाई करावी अशी मागणी खासदार म्हात्रे यांनी केली.
विशेष म्हणजे ड्रग्स माफीये आणि गुन्हेगार न्यायालयातून जामिनावर सुटल्यानंतरही हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी, दरोडे, धमकी, खंडणी, शेतकर्यांच्या जमिनी बळकावणे असे गंभीर गुन्हे करत आहेत. या गुंडांमागे असलेल्या राजकीय शक्तीमुळे पोलीस यंत्रणेला गुन्हेगारांना अटक करताना मोठी अडचण येत असल्याची बाब खासदार म्हात्रे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशात आणली. येथील ड्रग्स माफीये आणि गुन्हेगारांवर कारवाई करावी यासंदर्भातील आपल्या मागणीचे लेखी निवेदन देखील खासदार म्हात्रे यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याकडे दिले आहे. खासदार म्हात्रे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने ड्रग्स माफीया आणि गुन्हेगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. तसेच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांनी आपल्या मागणीकडे विशेष लक्ष दिले असून लवकरात लवकर या संदर्भात पोलीस यंत्रणेला योग्य त्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला दिले आहे, अशी प्रतिक्रिया खासदार बाळ्या मामा यांनी दिली आहे.