शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा सामना रोखठोकमधून शिंदे- फडणवीस सरकारवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप होता, पण ते तसे अर्धटव येतील असं कोणालाच वाटलं नव्हतं अशा शब्दात संजय राऊतांनी फडणवीस -शिंदे सरकारवर खोचक टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रातील एक पर्व संपले
राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्रातील एक पर्व संपले. जेमतेम अडीच वर्षांचाच हा कालखंड, पण बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन ते मुक्त झाले. मात्र महाविकास आघाडीचे सरकार हे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे नव्हे तर शिवसेनेतील बंडखोरांमुळे कोसळले. याच बंडखोरांनी भाजपाला राज्यसभेत मदत केली, त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. तसेच याच लोकांमुळे भाजपाचे विधान परिषदेचे सिट देखील निवडून आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
फडणवीसांनी उपमुख्यमंत्री होणे हाच खरा राजकीय भूकंप
राज्य सरकार कोसळले, शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केली. महाराष्ट्रात भूकंप झाला व असा भूकंप राजकारणात कधी झालाच नव्हता असे वर्णन एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत झाले. मात्र त्यापेक्षा मोठा भूकंप 9 दिवसांनी झाला. शिंदे यांच्या बंडाचे श्रेय हे मीडियाने देवेंद्र फडणवीस यांना दिले. मात्र सत्य वेगळेच होते. या बंडाचे सूत्रधार हे दिल्लीत होते. महाराष्ट्रातील भाजपाला संपूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले. या चाळीस आमदारांनी बंड केल्यानंतर आता राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येणार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार असाच अंदाज सर्वांनी बांधाला होता. मात्र झाले उलटेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप होता असे राऊत यांनी म्हटले आहे.
शिंदेंच्या हाताखाली काम करण्याची वेळ येणं हे फडणवीसांच्या कर्माचे फळ
पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते. ‘‘मला उपमुख्यमंत्रीपद नको. चंद्रकांत पाटील यांना ते द्या. मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा’’, अशी त्यांची विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली. कधी काळी आपलाच ज्युनियर मंत्री असलेल्या श्री. शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली. हे त्यांच्या कर्माचे फळ आहे. 2019 मध्ये सत्तेचा 50-50 टक्के फॉर्म्युला त्यांनी स्वीकारला नाही व महाविकास आघाडीचे सरकार त्यामुळे निर्माण झाले. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले व आता बंडखोर शिवसैनिक शिंदे यांना हे पद भाजप हायकमांडने दिले. काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड आहे,” अशी जहरी टीकाही संजय राऊतांनी केली आहे.
“उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना सांगितले, ‘‘माझ्याच लोकांनी दगा दिला.’’ चाळीस आमदारांपैकी काहींनी आधी शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार पाडला व याच गटाने भारतीय जनता पक्षाचा पाचवा उमेदवार विधान परिषदेत विजयी केला. दगाबाजीची ही बीजे रोवली जात असताना मुख्यमंत्री याच लोकांवर कुटुंबाचे घटक म्हणून विश्वास ठेवून होते. एका महानाट्यात छत्रपती शिवरायांच्या तोंडी एक ज्वलंत वाक्य आहे. छत्रपती सांगतात, ‘‘शत्रूची फौज कधीच मोजू नका. आपल्यातील फितूर किती ते मोजा!’’, असही राऊत म्हणाले आहेत.
“एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किती आमदार आहेत ते सोडा, पण हे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले व त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. पक्षांतरबंदीविरोधी कायद्याने त्यांची आमदारकी जाऊ शकते, पण महाराष्ट्राचे राज्यपाल व सर्वोच्च न्यायालयाने पक्षांतर करणाऱ्यांना बळ दिले. जर कोणाला पक्ष बदलायचा असेल तर त्याने जनतेच्या नजरेसमोर बदलला पाहिजे. त्याच्यात जनतेला तोंड देण्याचे सामर्थ्य असले पाहिजे. आमच्या लोकशाहीला तेव्हाच बळ लाभेल की, जेव्हा पक्ष बदलणारा राजीनामा देऊन पुन्हा जनतेत जाईल. तसे न करणाऱ्यांना कायद्याने बाद केले पाहिजे व पक्षांतरबंदी कायद्याची बूज राखली पाहिजे. मात्र महाराष्ट्रात वेगळे घडवले गेले. पक्ष बदलणाऱ्या अपात्र ठरण्याची शक्यता असलेल्या आमदारांनी महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य ठरवले व राज्यपाल महोदयांनी या घटनाबाह्य कृतीचे ‘पेढे’ खाल्ले!,” अशी टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांना अचानक हिंदुत्वाचा आणि भाजपचा पुळका आला हे समजण्यासारखे आहे, पण केसरकर ज्या सावंतवाडी मतदारसंघातून 2019 ला निवडून आले तेथे भाजपबरोबर युती असतानाही केसरकरांविरोधात राजन तेली हा बंडखोर भाजपने उभा केला होता व त्यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वतः आले. 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे 30 उमेदवार भाजपने बळ दिलेल्या बंडखोरांमुळे पडले. शिवसेनेच्या आमदारांची संख्या कमी व्हावी व मुख्यमंत्रीपदावरील शिवसेनेचा दावा कमजोर व्हावा यासाठीच ही खेळी होती. शिंदे गटात आज सामील असलेल्या किमान 17 आमदारांना भाजपने सरळ पाडण्याचे प्रयत्न केले हे सत्य आहे,” असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्राचे राजकारण आता आदर्श राहिले नाही. त्याची खिचडी झाली आहे. नवे सरकार सत्तेत आले, ते सुखाने नांदो. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा त्याग केला. मात्र त्यांच्या या सत्तात्यागाने राज्यातील जनता हळहळली. हेच तर उद्धव ठाकरे यांनी कमावले. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, मात्र या बंडखोरीमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यात भूकंप झाल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.