जल जीवन मिशनअंतर्गत २०२४ पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दीष्ट्य आहे. ते गाठण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून, सर्व यंत्रणांनी त्यासाठी युद्ध पातळीवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेत जलजीवन मिशन नियोजन व अंमलबजावणी कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्यात ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
२४ हजार कोटींचा निधी लागणार
जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत ३८ हजार ६५३ योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट्य असून, त्यासाठी २४ हजार ९४९ कोटी रुपये खर्च येणार आहे. २०२१-२२ या वर्षात मार्च अखेर पर्यंत २९ हजार ८५३ योजना पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यासाठी १२ हजार ९५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
नळजोडण्यांचे ६५ टक्के उद्दीष्ट्य पूर्ण
जल जीवन मिशन अंतर्गत २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागात १ कोटी ४२ लाख ३६ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दीष्ट्य आहे. त्यापैकी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ९३ लाख ६ हजार नळजोडण्यांचे काम ( ६५ टक्के काम) पूर्ण झाले आहे. उर्वरित ४९ लाख २९ हजार नळजोडण्यांचे काम बाकी आहे. त्यापैकी २०२१-२२ या वर्षात २७ लाख ४५ हजार नळजोडण्या देण्याचे उद्दीष्ट्य आहे. राज्यात आतापर्यंत शाळांमध्ये ८६, तर अंगणवाड्यांमध्ये ७७ टक्के नळ जोडण्या देण्याचे काम पूर्ण झाले आहे.