कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना घरातील भांडी, कपडे तसेच साहित्य विकत घेण्यासाठी तातडीची मदत म्हणून १० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आज, शुक्रवारपासून पूरग्रस्तांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दिली.
पूरग्रस्तांना १० हजार रुपयांची तातडीची मदत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नाही आणि नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. तरीही तातडीची मदत म्हणून ही रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
आपत्तीग्रस्तांना रोख रक्कमेचे वाटप केले तर अनेक आरोप होतात. पैशांचे योग्य वाटप झाले नाही तर गैरप्रकाराचे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचे नाही म्हणून मदतीचे पैसे पूरग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
हेही वाचा – सिंधुदुर्गात कळणे खनिज प्रकल्पातील बांध फुटला