मुंबई – दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर झाला. पुरवणी परीक्षेत दहावीचा केवळ ३० टक्के आणि बारावीचा ३२ टक्के निकाल लागला आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता. तर, उद्यापासूनच गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मुल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे.
हेही वाचा – MPSC, बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आल्याने सरकारचा विद्यार्थ्यांसमोर ‘हा’ पर्याय
फेब्रुवारी २०२२ मध्ये दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल जून महिन्यात लागला. या परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांच्या ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून २० हजार ५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार ४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५ हजार ८०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच फक्त ३०.४७ टक्के निकाल लागला आहे.
मार्च २०२२ मध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचाही निकाल जून महिन्यात लागला होता. या निकालात अनुत्तीर्ण ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्यात आल्या. विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएससी व्होकेशन या शाखातील एकूण ५४ हजार ५८ विद्यार्थ्यांनी नऊ विभागीय मंडळातून अर्ज केले होते. त्यापैकी ५३ हजार ५४७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १७ हजार २८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच एकूण निकालाची टक्केवारी ३२.२७ आहे.
हेही वाचा – एमपीएससीच्या परीक्षा पॅटर्नमध्ये सुधारणा, अधिकृत संकेतस्थळावर बदलाच्या सर्व सूचना
दरम्यान, उद्यापासून दहावी, बारावी निकालातील कोणत्याही समस्यांबाबत विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. शाळा, महाविद्यालयात अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.