मुंबईः गेल्या दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनासंदर्भात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. त्या बैठकीत मोदींनी महाराष्ट्रासह काही राज्यांना इंधनावरील व्हॅट कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर केंद्राकडून 13 हजार 627 कोटी जीएसटी परतावा येणं बाकी असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगत पलटवार केला होता. त्यावरच आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी खुलासा केला आहे. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचीत केलीय.
महाराष्ट्र राज्याकडे कोळसा आणि रेल्वे मंत्री यांचे साधारण 11 हजार कोटी महाराष्ट्राकडून परत येणं आहे. मी फोनवर माहिती घेतली असून, त्याचेसुद्धा पेपर्स मला येतील. मी ते प्रूफ देऊ शकतो, असंही केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले आहेत.
आता महाराष्ट्रात चोराच्या उलट्या बोंबा सुरू झालेल्या आहेत. उलट आम्ही म्हणतोय व्हॅट कमी करा, नागरिकांना सवलत द्या आणि ते म्हणतात आमचा जीएसटी येणे बाकी आहे. जीएसटी कुठे येणार आहे हा माझ्याकडे कागद आहे. मी अर्थमंत्रालयाकडून घेतलेली ही टिपण्णी आहे. त्यापेक्षा मला सांगावसं वाटतं,
2017 आणि 18 पासून ज्या वेळेस जीएसटी लागू झाला, तो 2020-21 पर्यंत कुठल्याही प्रकारचा जीएसटी शिल्लक राहिलेला नाही. 2021-22 म्हणजे या चालू वर्षामध्ये साधारण 13 हजार 627 कोटी परतावा महाराष्ट्राला द्यायचा आहे हे बरोबर आहे. ठरलेल्या जीएसटीच्या बैठकीनुसार हे पैसे ऑगस्टमध्ये महाराष्ट्र सरकारला मिळणार आहेत. म्हणून महाराष्ट्राला केंद्राकडून जीएसटीच्या माध्यमातून जे पैसे द्यायचे आहेत, ते ठरलेल्या नियमाप्रमाणे ऑगस्टमध्ये मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.