राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस आधिकाधिक वाढताना दिसत आहे. काल, शनिवारी राज्यात ९ हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले होते. मात्र आज ही संख्या ११ हजार पार गेली आहे. राज्यात आज ११ हजार ८७७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून २ हजार ०६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र जर राज्यात अशीच नव्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर आणखीन कडक निर्बंध लागू शकतात. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका अधिक गडद होऊ शकतो.
राज्यात एकाबाजूला कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर दुसऱ्याबाजूला ओमिक्रॉनचा धोका वेगाने वाढताना दिसत आहे. त्यामुळे जर अशीच परिस्थितीत दिवसेंदिवस गंभीर होत राहिली तर दिल्ली आणि पश्चिम बंगालप्रमाणे पुन्हा राज्यात कडक निर्बंध लावले जाऊ शकतात. राज्यातील आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६६ लाख ९९ हजार ८६८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ५४१ जणांचा मृत्यू झाला असून ६५ लाख १२ हजार ६१० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ४२ हजार २४ सक्रीय रुग्ण आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के एवढे झाले असून मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ९२ लाख ५९ हजार ६१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख ९९ हजार ८६८ (९.६७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ४३ हजार २५० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १ हजार ९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा – Omicron Variant: राज्यात आज ५० नव्या ओमिक्रॉनबाधितांची वाढ; एकट्या पुणे शहरात आढळले ३६ रुग्ण