मुंबई – मुंबईचे खास आकर्षण असलेला गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना मुंबई महापालिकेने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्राप्त एकूण ३,२५५ मंडळांच्या अर्जापैकी पात्र ठरलेल्या १,९४७ मंडळांना परवानगी दिली आहे. मात्र अटी व शर्ती यांची प्रतिपूर्ती करण्यात काही त्रुटी असल्याने व अन्य कारणास्तव ४२५ मंडळांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
तसेच, परवानगीच्या प्रक्रियेत असलेल्या अर्जांनाही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास ऑगस्ट अखेरपर्यंत परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.
मुंबईत गेल्या दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यामुळे लावलेल्या टाळेबंदीमुळे गणेशोत्सव व इतर सण आणि उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले व हटवले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना व गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला. यंदा धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
मुंबईत गणेशोत्सव हेच मोठे आकर्षण आहे. मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. या मंडळांना दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी वाहतूक पोलीस, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस ठाण्यांची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र गणेश मंडळांची गैरसोय दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने विविध प्राधिकरणाच्या परवानगी एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू केली आहे.
आतापर्यंतची स्थिती :
- परवानगीसाठी मंडळांकडून आलेले अर्ज – एकूण ३,२५५
- परवानगी मिळालेली मंडळे – १,९४७
- दुबार आलेले अर्ज – ५२३
- फेटाळले अर्ज – ४१५
हेही वाचा : राज्यात 24 तासांत 1910 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 7 रुग्णांचा मृत्यू