मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अनेक मंत्री, नगरसेवक आणि आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. परंतु शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
40 बंडखोर आमदारांपैकी 22 आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटानं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातील प्रसिद्ध सदर असलेल्या रोखठोकमधून हा दावा करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. तसेच एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील, असं सामनातील रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत गेले आणि मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी धोरणांतर्गत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी रेल्वेकडून महाराष्ट्र सरकारला हव्या असलेल्या जागेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी घेऊन आले, असं रोखठोक सदरातून म्हटलं आहे.
हेही वाचा : प्रत्येक ठिकाणी शक्तिप्रदर्शन करण्याची गरज काय? किशोरी पेडणेकरांचा भाजपला सवाल