महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे राज्याची चिंता नक्कीच वाढली आहे. मात्र त्यातही दिलासा देणाऱ्या काही घटना घडत आहे. अशीच एक घटना म्हणजे सांगलीतील २६ पैकी २२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे, ही माहिती स्वतः कॅबिनेट मंत्री आणि सांगली जिह्ल्याचे पालकमंत्री असणारे जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तसेच यामुळे आपल्याला खुप दिलासा मिळाला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १३६४ झाली आहे. त्यातील निम्मे रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. त्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यातील कोरोनाबाधित बरे होत असतील तर राज्याचा आकडा आपोआपच नियंत्रणात राहणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांशी व प्रशासनाशी चर्चा करून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी विलगीकरण, समुह संसर्गाच्या ठिकाणाची ओळख, तात्काळ कार्यवाही या त्रिसूत्री धोरणाला आम्ही जिल्ह्यात अंमलात आणले. प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने आम्ही कोरोनाच्या प्रादुर्भावाला आटोक्यात आणण्यात यशस्वी झालोय
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 10, 2020
म्हणाले, त्रिसूत्री धोरणाला आले यश
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने जयंत पाटील यांनी सांगलीतील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांबाबत समाधान व्यक्त केले आहे. तसेच हे यश सरकारने आखलेल्या त्रिसूत्री धोरणाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. विलगीकरण, समुह संसर्गच्या ठिकाणाची ओळख, तात्काळ कार्यवाही या तीन सुत्रांचा अवलंब केल्यामुळेच कोरोनाला रोखू शकलो असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच एकीकडे पालकमंत्री आणि दुसरीकडे इस्लामपूर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून दुहेरी दडपण आपल्यावर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सांगलीच्या जनतेने दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. नागरिकांनी विलगीकरणाचा राबवलेला प्रयोग १०० टक्के यशस्वी केल्याने आपण यावर मात करू शकलो. पण गाफील राहू नका. माझी महाराष्ट्रातील जनतेस विनंती आहे, शासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करा तर आणि तरच आपण या रोगावर विजय मिळवू शकू
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 10, 2020
काय आहे राज्याची स्थिती
राज्यात काल कोरोनाच्या २२९ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यात आता रुग्ण संख्या १३६४ झाली आहे. कोरोनाबाधित १२५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आतापर्यंत १२५ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ३६ हजार ५३३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३१ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दरम्यान, काल २५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये पुण्यातील १४, मुंबईतील ९ तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
हेही वाचा –
Coronavirus: भारत प्लाझ्मा थेरपीच्या चाचण्या सुरू करण्याच्या तयारीत