नव्या वर्षात मध्य रेल्वेवर ३६ नवीन लोकल फेऱ्या वाढणार असून प्रवाशांच्या गर्दीत घट होणार आहे. मध्ये रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या १७७४ ने वाढून १८१० इतकी होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या ठाणे-दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे उद्धाटन येत्या शुक्रवारी होत आहे. या मार्गिकेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग तयार झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने लोकल फेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ३४ वातानुकूलित लोकल आणि २ सामान्य लोकल अशा एकूण ३६ फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. मुंबईकरांचा लोकल प्रवास गर्दीमुक्त, वेगवान आणि सुखकर होण्यासाठी मुंबई शहर वाहतूक प्रकल्प-२ मध्ये ठाणे ते दिव्याच्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होते. मात्र, आता या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून येत्या १८ तारखेला मोदींच्या हस्ते या मार्गिकांचं लोकार्पण करण्यात येणार आहे.
सीएसएमटी ते कल्याण मार्गावर सध्या १० एसी लोकल फेऱ्या चालवल्या जात असून त्यामध्ये आणखी ३४ फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे या मार्गावरील एकूण फेऱ्यांची संख्या ४४ इतकी होणार आहे.
मध्य रेल्वेने ३० जानेवारी २०२० पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १७ डिसेंबर २०२० पासून सीएसएमटी ते कल्याण मार्गावर दुसरी एसी लोकल चालवण्यात आली. सध्या रेल्वेच्या मध्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान दहा वातानुकूलित लोकल ट्रेन धावत आहेत.