औरंगाबाद – नवरात्रोत्सवानिमित्त खरेदी केलेल्या भगर आणि भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याची घटना औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात समोर आली आहे. विषबाधा झालेल्या व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगबादच्या लासूर स्टेशन भागातील एकाच वेळी 13 जणांनी विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. तर जलना जिल्ह्यातील 24 जणांना विषबाधा झाली आहे.
औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथे नवरात्रोत्सवानिमित्त भगर व भगरीचें पीठ परिसरातील विविध गावांमधील ग्रामस्थांनी खरेदी केले होते. मात्र, या भगरीचे सेवन केल्याने 13 ग्रामस्थांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांना पोट दुखणे, उलट्या, चक्कर येत असल्याने गावातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
प्रकृती स्थिर –
या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर म्हणाले, लासूर स्टेशन येथील दुकानातून संबंधितांनी भगर खरेदी केल्याचे समजले. यासंदर्भात अन्न व औषधी प्रशासन विभागास तपासणी करण्याबाबत सूचना करण्यात येतील. तर अन्नबाधा झालेल्यांची प्रकृती स्थिर आहे.
जालन्यात 24 जणांना विषबाधा –
औरंगाबाद प्रमाणे जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात भगर व भगरीच्या पिठातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. परतुर तालुक्यातील 4 गावांमधील 24 जणांना विषबाधा झाली असून यात महिलांचा सर्वाधिक समावेश आहे. विषबाधा झालेल्या सर्वच व्यक्तींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.