मुंबई : कोकण रेल्वे महामंडळाअंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण 37 रेल्वेस्थानके आहेत. या रेल्वेस्थानकांच्या परिसराचे मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. ही रेल्वेस्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीचे कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उपअभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दीपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.
कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 10 वर्षे देखभाल दुरुस्ती
कोकण रेल्वे महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या परस्पर सहकार्यामुळे सर्व कामे गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
या सामंजस्य करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वेस्थानकांच्या पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करुन या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वेस्थानक परिसराचे सुशोभीकरण करताना रेल्वे प्रवाशांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रेल्वेस्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कोकण रेल्वेस्थानकांच्या पोहोचमार्गाची पुढील 10 वर्षांपर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार 30 वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.