राज्यातील गोरगरीब नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीचा तब्बल ४ कोटी जनतेने लाभ घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात अर्थात २६ जानेवारी २०२० ते १ मे २०२१ या कालावधीत नागरिकांनी हा आस्वाद घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यात या योजनेचा २६ जानेवारी २०२० रोजी शुभारंभ झाला. त्यानुसार केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब जनतेला शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय मार्च २०२० मध्ये घेण्यात आला होता. हा सवलतीचा दर मार्च २०२१ पर्यंत लागू करण्यात आले होते. मात्र, अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने ही थाळी आता मोफत देण्यात येत आहे. तसेच राज्यशासनाने यापूर्वीच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत सुरू असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या कोट्यात दीडपट वाढ केली आहे. जे शिवभोजन केंद्र दिवसाला १०० थाळ्या वितरीत करत होते, आता ते केंद्र १५० थाळ्या वितरीत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवभोजन थाळीच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन अनुदान देत आहे. – छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री