राज्यातल्या ४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज राज्य सरकारने काढले आहेत. यामध्ये ग्रामविकास विभागातून तडकाफडकी हटविण्यात आलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी अरविंद कुमार यांची महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी कुमार यांची बदली अतिरिक्त मुख्य सचिव आणि विशेष कार्य अधिकारी म्हणून महसूल, वन विभागात झाली आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सचिव सीमा व्यास यांची नियुक्ती प्रधान सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी १, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय या रिक्त पदावर करण्यात आली आहे. तर ओ. पी. गुप्ता यांची नियुक्ती प्रधान सचिव, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागात झाली आहे.
गेल्याच महिन्यात राज्य सरकारने तब्बल १३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये भंडारा, यवतमाळ, मुंबई, बुलढाणा, पुणे, नागपूर अशा जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. कोरोना काळात राज्य सरकारने मोठ्या संख्येने IAS, IPS आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यावरून अनेकदा विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं राज्य सरकारवर टीका देखील केली आहे.