सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध असताना पुणे शहरात राहणाऱ्या पाकिस्तानी हिंदूना भारताचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ७ मार्च रोजी एकूण ४५ पाकिस्तानी हिंदूंना भारताचे नागरिकत्व बहाल करण्यात आले. मूळ हिंदू धर्माचे असल्याकारणाने या सर्व नागरिकांना पाकिस्तानात अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. त्यामुळे गेल्या काही काळापासून हे नागरिक पुण्यामध्ये वास्तव्याला होते. दरम्यान, अनेक प्रयत्नांनतर अखेर भारतीय नागरिकत्व मिळाल्यामुळे या नागरिकांमध्ये काल आनंदाची लाट पसरली होती. पाकिस्तानात हिंदू समाज हा अल्पसंख्याक असल्यामुळे त्यांना तिथे अनेक अडचणींशी सामना करावा लागतो. दरम्यान, पाकिस्तानी असल्यामुळे पुण्यात त्यांना अशाचप्रकारे अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी ते भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या प्रयत्नात होते.
‘आम्हाच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि आम्हाला भारतीय नागरिकत्व मिळाले. त्यामुळे आम्ही खूपच खुश आहोत’, अशी प्रतिक्रिया जयप्रकाश नेभवाणी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
Pune: 45 persons from minority communities of Pakistan who had been living in India for many years granted citizenship. Jaykash Nebhvani, who got Indian citizenship says, “We faced a lot of troubles in Pakistan and then struggled here to get nationality, finally we got it,” pic.twitter.com/TWIe5H9i57
— ANI (@ANI) March 7, 2019
सर्वच ४५ नागरिकांना पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कायदेशीररित्या भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आलं. पाकिस्तानातील प्रतिकूल परिस्थिती, डोक्यावर भीतीची टांगती तलवार आणि काम-धंदा या मुख्य कारणांमुळे हे ४५ जण गेल्या काही वर्षांपासून पुण्यामध्ये वास्तव्य करत आहेत. मात्र, त्यातील कुणाकडेच भारतीय नागरिकत्व नव्हते. ते मिळावे यासाठी या सर्वांनी खूपच प्रयत्न केले. वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा केला. अखेर या सगळ्यांची कागदपत्रं तपासून आणि अन्य कायदेशीर कारवाया पार पाडून मग त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. मुळचे भारतीय नसल्यामुळे त्यांना इथल्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रेशन कार्ड, आधार कार्ड यांसारख्या उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या सर्वच व्यवहारांमध्ये अडचणी येत होत्या. इतकंच नाही तर पाकिस्तानी नागरिकत्व असल्यामुळे त्यांवा घर भाड्यानेही घेतानाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आता भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर त्यांच्या सर्वच समस्यांवर अंतिम तोडगा निघाला आहे असंच म्हणावं लागेल.