या यादीत नगर जिल्ह्यातील 2 लाख 52 हजार शेतकर्यांचा समावेश असून ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या दोन गावांतील शेतकर्यांना तूर्त कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. बाबुडी घुमट व विळद अशी या दोन गावांची नावे आहेत.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली असून त्यात नगर, वर्धा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्यांचा समावेश आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्यांवरील भार हलका करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी पहिली यादी सोमवारी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती.
वर्धा जिल्ह्यातील 46 हजार 424 शेतकर्यांचा दुसर्या यादीत समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील 166 शेतकर्यांना कर्जमाफी मिळाली होती. त्यातील 154 शेतकर्यांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. दुसर्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील 42 हजार 913 शेतकर्यांचा समावेश असून पुढील प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली.
त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली होती. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकर्यांना प्रमाणपत्र दिले जात आहे. जिल्हा पातळीवर कर्जमाफीचे काम सुरू झाले आहे. कर्जमाफीसाठी एकूण 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.