मुंबईः त्यांनी वर्षा सोडलं, आपल्या 52 आमदारांना सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत. आम्हीसुद्धा त्यांच्याकरिता भरपूर केलेलं आहे. आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाहीत, असा टोला शिंदे गटाचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटलांनी गुवाहाटीतील ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये इतर आमदारांना संबोधित केलंय, त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
हे लोक फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेः गुलाबराव पाटील
1992 दंगली वेळी आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप जेलमध्ये होतो. त्यावेळेस संजय राऊत कुठे होते मला माहीत नाही. 302 काय असते हे संजय राऊतांना माहीत नाही, आम्ही सगळ्यांनी ते भोगलेलं आहे. तडीपार काय असतं हे त्यांना माहीत नाही, दंगलीच्या वेळी पायी चालणं काय असतं हे त्यांना माहीत नाही. हे लोक फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. आपण बाळासाहेबांचे विचारांनी प्रेरित होऊन क्रिया केलेले कार्यकर्ते आहोत. 80 टक्के जरी संघटनेचा असला तरी 20 टक्के स्वतःच्या सहभाग आहे. संजय राऊतांनी 47 डिग्री सेल्सियसमध्ये जळगावात येऊन 35 लग्न लावून दाखवावीत मी त्यांना 72 म्हणून समजून घेईन. रात्री 12 वाजताही आमचा मोबाईल सुरू असतो. आपण 39 आणि अपक्ष 11 ते 12 मंडळी सभागृहात आणि डिबेटमध्ये काफी आहोत, असंही गुलाबराव पाटील म्हणालेत.
जेव्हा वेळ येईल तेव्हा मी त्यांना चुना लावेन, गुलाबरावांचा संजय राऊतांना टोला
आजचा प्रसंग, कालचा प्रसंग आणि परवाचा प्रसंग, आता आपण कसे कसे आलेले आहोत. ते मला सांगण्याची गरज नाही. आपल्या सगळ्यांवर मजबूत पद्धतीनं जिल्ह्यात आणि आपापल्या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ते होत असतानाही बऱ्याच पद्धतीनं आपल्या पाठीमागे लोक उभे राहत आहेत. आपण शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलेले आहोत. आपल्यावर भरपूर टीका झाली आहे. कधी प्रेत काढून घेऊ, तुमचे बाप किती, आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहीत नाही. 100 टक्के आपण शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादानं या पदापर्यंत पोहोचलो आहोत. त्यांनी वर्षा सोडलं, आपल्या 52 आमदारांना सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत. आम्हीसुद्धा त्यांच्याकरिता भरपूर केलेलं आहे. आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाहीत. संजय राऊत सांगतात टपरीवर पुन्हा पाठवू, त्यांना चुना कसा लावतात अजून माहीत नाही अजून. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी त्यांना चुना लावेन, असा इशाराही त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.
हेही वाचाः विशेष अधिवेशन बोलावणं घटनाबाह्य, राज्यपालांनी अनेकवेळा घटनेचं उल्लंघन केलंय – उल्हास बापट