घरदेश-विदेशबड्या उद्योगपतींची 68 हजार कोटींची कर्ज माफ

बड्या उद्योगपतींची 68 हजार कोटींची कर्ज माफ

Subscribe

रिझर्व्ह बँक करबुडव्यांवर मेहरबान, नीरव मोदी, मल्ल्याचा समावेश

एकीकडे देशातल्या शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी किंवा आर्थिक सहाय्यासाठी वारंवार सरकारकडे हात पसरावे लागत असताना दुसरीकडे देशाची शिखर बँक असलेल्या आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातल्या बड्या उद्योगपतींची हजारो कोटींची कर्ज माफ केली आहेत. यामध्ये अनेक बँकांची कर्जे बुडवून परदेशी पळालेल्या मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय मल्ल्यासारख्या कर्जबुडव्या उद्योगपतींचादेखील समावेश आहे. माफ करण्यात आलेल्या कर्जांची एकूण रक्कम तब्बल 68 हजार 607 कोटींच्या घरात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी केलेल्या अर्जाच्या उत्तरातून थेट रिझर्व्ह बँकेकडूनच याची माहिती देण्यात आली आहे. साकेत गोखले यांनी ट्विटरवर ही माहिती आणि या 50 जणांची यादीच जाहीर केली आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची ही कर्जाची रक्कम आहे.

16 फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान थकित कर्जाची रक्कम आणि कर्जदारांची नावे यासंदर्भात विचारणा केली होती. मात्र, त्याला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर द्यायला नकार दिला होता. त्यामुळे अखेर साकेत गोखले यांनी थेट आरबीआयकडे याची विचारणा करणारा अर्ज माहिती अधिकारात दाखल केला होता. त्याला 24 एप्रिल रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उत्तर दिले. यामध्ये कर्जदारांची यादीच बँकेने दिली आहे. बर्‍याच काळापासून साकेत गोखले माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करत असून त्यांनी 27 एप्रिल रोजी यासंदर्भात केलेल्या ट्विटमधून ही माहिती उघड झाली आहे.

- Advertisement -

सर्वाधिक कर्जमाफी मेहुल चोक्सीचीच!
आरबीआयने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार या 68 हजार कोटींमध्ये 16 फेब्रुवारी 2020पर्यंत देण्यात आलेल्या कर्जांचा समावेश आहे. या यादीमध्ये सर्वात वरचा क्रमांक मेहुल चोक्सीच आहे. त्याच्या गितांजली जेम्स लिमिटेडचे सर्वाधिक कर्ज माफ करण्यात आलेले आहे. गितांजलीचे 5 हजार 492 कोटींचे कर्ज आरबीआयने माफ केले आहे. मेहुल चोक्सीच्याच इतर कंपन्यांपैकी गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रॅण्ड्स लिमिटेड या कंपन्यांचीही अनुक्रमे 1 हजार 447 कोटी आणि 1 हजार 109 कोटींची कर्ज माफ करण्यात आली आहेत. मेहुल चोक्सीकडे अँटिग्वाचे नागरिकत्व असून तो फरार आहे. त्याचा पुतण्या नीरव मोदीदेखील फरार असून तो लंडनमध्ये आहे.

या लिस्टमध्ये चोक्सीनंतर क्रमांकावर संदीप झुनझुनवाला आणि संजय झुनझुनवाला यांची आरईआय अ‍ॅग्रो लिमिटेड (4 हजार 314 कोटी), जतिन मेहताची विन्सम डायमंड्स (4 हजार 76 कोटी) यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे या पहिल्या तिन्ही कर्ज बुडव्यांवर ईडीची नजर असून ते कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत. यानंतर यादीमध्ये कानपूरस्थित रोटोमॅक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कोठारी ग्रुपच्या कंपनीचा समावेश आहे. त्यांचे 2 हजार 850 कोटींचे कर्ज माफ करण्यात आले आहे. तर त्यांच्या खालोखाल कुडोस केमिकल, पंजाब (2 हजार 326 कोटी), बाबा रामदेव आणि त्यांचा शिष्य बालकृष्ण यांची रुची सोया इंडस्ट्रीज, इंदौर (2 हजार 212 कोटी) आणि झूम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (2 हजार 12 कोटी) यांचा समावेश आहे. यादीमध्ये लंडनमध्ये फरार झालेला किंगफिशरचा मालक विजय मल्ल्या (1 हजार 943 कोटी) आणि हरीष मेहताची फॉरेव्हर प्रेशियस ज्वेलरी अ‍ॅण्ड डायमंड (1 हजार 962 कोटी) याचादेखील समावेश आहे. एकूण 50 जणांच्या या यादीमधील 6 उद्योग हे देशातील प्रथितयश हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. त्यानंतर आयटी, इन्फ्रास्ट्रक्चर, ऊर्जा, औषधे अशा कंपन्यांचादेखील यात समावेश आहे.

- Advertisement -

‘टेक्निकली रिटर्न ऑफ’एक पळवाट!
रिझर्व्ह बँकेच्या उत्तरामध्ये ही सर्व कर्ज ‘टेक्निकली रिटर्न ऑफ’ अशी संज्ञा वापरली आहे. याचा सरळ साधा अर्थ असा होतो, की बँकांनी दिलेल्या ज्या कर्जांची अनेक वर्षे वसुली सुरू आहे, पण ती होऊ शकलेली नाही आणि कर्ज घेणार्‍याकडे कर्ज फेडण्याइतकी मालमत्ताच उरली नसेल, तर ती कर्ज अशा प्रकारे ‘टेक्निकली रिटर्न ऑफ’ करण्यात येतात. अशा प्रकरणांमध्ये बँका त्यांची वसुलीची प्रक्रिया सुरू ठेवतात, पण ती कर्जे बँकांच्या बॅलन्स शीटमध्ये दाखवली जात नाहीत. त्यामुळे बँकांच्या कामगिरीवर आणि एनपीए अर्थात नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्सच्या ताळेबंदावर त्याचा परिणाम होऊ नये. मात्र, असे जरी असले, तरी अशा कर्जांपैकी फक्त 15 ते 20 टक्केच कर्जांची वसुली होते, असे रिझर्व्ह बँकेचे माजी उप गव्हर्नर के. सी. चक्रवर्ती यांचे म्हणणे आहे.

राहुल गांधींचा हल्लाबोल
बड्या उद्योगपतींना कर्जमाफीचे प्रकरण समोर येताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला आहे. त्यांनी, एक व्हिडिओ शेअर करत सरकारने मोठ्या बँक बुडव्यांची नावे लपवल्याचा आरोप केला आहे. संसदेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी, आता खुद्द रिझर्व्ह बँकेनेच नीरव मोदी, मेहुल चोक्सींसह भाजपच्या मित्रांची नावे बँकेचे कर्ज बुडवणार्‍यांच्या यादीत टाकली असल्याचे म्हटले आहे. ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, मी संसदेत एक सरळ प्रश्न विचारला होता – मला देशातील ५० सर्वात मोठ्या बँक चोरांची नावे सांगा. अर्थमंत्र्यांनी नावे सांगण्यास नकार दिला.

आता आरबीआयने नीरव मोदी, मेहुल चोक्सींसह भाजपच्या ‘मित्रां’ची नावे बँक चोरांच्या यादीत टाकली आहेत. यामुळेच संसदेत हे सत्य लपवण्यात आले, हे सिद्ध झाले आहे. बजेटवेळी राहुल गांधी यांनी लोकसभेत बँकिंग फ्रॉडचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी सरकारकडे देशातील सर्वात मोठ्या 50 डिफॉल्टर्सची माहिती मागितली होती. हा प्रश्न त्यांनी प्रश्नोत्तराच्या काळात केला होता. सरकारला अत्यंत सोपा प्रश्न विचारला. देशातील ५० बँक बुडवे कोण आहेत. मला कसल्याही प्रकारचे उत्तर मिळाले नाही. पंतप्रधान मोदी म्हणतात, ज्यांनी भारतीय बँकांमध्ये चोरी केली, मी त्यांना पकडून परत आणीन. म्हणून मी सरकारला त्यांची नावे विचारली. मला उत्तर मिळाले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -