नांदेड : ऑगस्ट महिन्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 48 तासांमध्ये 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यात घडल्याची माहिती काल (ता. 02 ऑक्टोबर) समोर आली. नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. 24 तासांमध्ये नेमके इतके रुग्ण दगावले कसे? याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण आता काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही तासांमध्ये या रुग्णालयात आणखी 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये 4 बालकांचा समावेश आहे. त्यामुळे आता मृतांची आकडेवारी 31 वर गेली असून यामध्ये 16 बालकांचा समावेश आहे. (7 more patients die in Nanded hospital, death toll rises to 31; Congress leader Ashok Chavan information)
हेही वाचा – अजून कितीदा पुन्हा पुन्हा हेच घडू देणार? नांदेडच्या घटनेवरून ठाकरे गट आक्रमक
नांदेड जिल्ह्यातील काल सोमवारी 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ही घटना समजातच अशोक चव्हाण यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. सदर घटना उघडकीस येताच विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी देखील या घटनेवरून भाजपवर निशाणा साधला. तर रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यामुळे वेळेवर औषध पुरवठा झाला नसल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी.— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 3, 2023
सोमवारी ही घटना घडल्यानंतर अशोक चव्हाण रुग्णालयातील अधिष्ठातांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना आणखी 70 रुग्ण हे अत्यवस्थ असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. या रुग्णालयातील नर्सेसच्या बदल्या झाल्या आहेत. डॉक्टरांची कमतरता आहे. तेव्हा तातडीने सरकारने याची दखल घ्यावी. ज्या कमतरता या रुग्णालयात आहेत, त्याची तातडीने पूर्तता करावी. तसेच घटनेची चौकशी करावी अशी मागणी चव्हाणांनी केली होती.
तर, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, औषध तुटवडा या कारणांमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. आरोग्य पथक येऊन चौकशी करेल. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनी मुश्रीफ यांच्याकडून सांगण्यात आले असले तरी शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचे लोण छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचे आहे. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात मागच्या 24 तासांमध्ये 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 10 मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे, अशी माहिती समोर आली आहे.