खारघर दुर्घटनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात आलेल्या १४ श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणावरून विरोधकांकडून राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार निशाणा साधला जात आहे. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांनी या प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी या मागणीसाठी थेट राज्यपालांना पत्र धाडलंय. तर दुसरीकडे आता या प्रकरणाच्या चौकशीला वेग आलाय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ श्रीसदस्यांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारकडून एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीय.
खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. अशात आता या प्रकरणात सरकारकडून मोठं पाऊल उचलण्यात आलंय. या दुर्घटनेतील मृत पावलेल्या श्री सदस्यांची संख्या आता १४ वर पोहोचली असून अद्याप १० रुग्ण वेगवेगळया रुग्णालयात उपचार घेत आहेत. १४ मृतांची ओळख सर्व मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. आता या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. या संदर्भात सीएमओने ट्विट करुन माहिती दिली आहे.
खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 20, 2023
खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलं होतं. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर शासकिय यंत्रणा राबविण्यात आली, मात्र त्याचा खर्च दाखवण्यात आला नाही याची ही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.
त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती स्थापित करण्याचा मह्त्त्वाचा निर्णय घेतलाय. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 14 जणांचा मृत्यू हा उष्माघातानेच झाल्याचं पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलंय. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे यातील काहींना आधीपासून व्याधी होत्या. ज्यामुळे वेळेवर न खाणं आणि प्रचंड ऊन याची भर पडली आणि त्यांचा मृत्यू झाला. उन्हात बसलेल्या लोकांना पाण्यानंही काही फरक पडला नसता, त्यांना सावलीचीच गरज होती, असं पोस्ट मॉर्टम करणाऱ्या एका डॉक्टरनं सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे पुरस्कार सोहळ्याच्या एक दिवस आधी पनवेल जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पाहणीसाठी गेले होते. पाहणी करताना त्यांनाही उन्हाचा त्रास झाला. पण ही महत्त्वाची बाब त्यांनी वरिष्ठांना सांगितली नाही, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.