शिर्डीतील साई मंदिरात फुल, हारं आणि प्रसाद नेण्यावर बंदी आणल्याने गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद रंगतोय. याविरोधात काल साई मंदिर परिसरातील शेकडो व्रिकेते आणि ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले. या आंदोलनानंतर साई मंदिर प्रशासन मंदिरात हार, फुलं आणि प्रसादावरील बंदी उठणार असल्याची शक्यता होती. मात्र मंदिरातील वादाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. या वादावर आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक बैठक घेतली, या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची घोषणा केली आहे. तसेच समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
साई मंदिरात कोरोना काळापासून फुल, प्रसाद आणि हार नेण्यास बंदी घातली आहे. ज्यावरून मोठा वाद उफाळून आला. यावेळी स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांकडून काल साई बाबा मंदिरात शासन निर्णय झुगारत हारं- फुलं नेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी संस्थानाचे सुरक्षा रक्षक आणि फुलं विक्रेतांमध्ये काही वेळ बाचाबाची झाली. या पार्श्वभूमीवर आज साई संस्थान, स्थानित विक्रेते आणि ग्रामस्थांची एक बैठक पार पडली. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.
या बैठकीनंतर बोलताना विखे पाटील म्हणाले की, या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे. या समितीमध्ये सीईओ, कार्यकारी अधिकारी, डीडीआर यांचा समावेश आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. एक महिन्यात या समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश आहे, ज्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. त्यामुळे किमान एक महिन्यानंतर मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद वाहता येणार नाही.
जनभावनाचा आदर झाला पाहिजे हीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना आहे. आजच्या बैठकीत फुल उत्पादक आणि संस्थान यात करार करण्यात यावा, तसेच शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करावी, फुल विक्रेत्यांकडून साई भक्तांची लूट होत असल्याची तक्रारी होत्या, मूळ उत्पादकांना लाभ मिळाला पाहिजे, शिर्डी गुन्हेगारीचा अड्डा बनायला नको असेही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.