घरदेश-विदेशभारतातील समृद्ध विविधतेचे महाराष्ट्रात दर्शन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भावना

भारतातील समृद्ध विविधतेचे महाराष्ट्रात दर्शन, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भावना

Subscribe

मुंबई : भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला प्रचंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम दिले. आमच्यासोबत बरोबरीने चालले. लाखोंच्या संख्येने नांदेड आणि शेगाव येथील सभेमध्ये सहभागी झाले. या सर्व अबालवृद्ध, युवक, महिला यांच्या प्रेमाने आमचे मन भरून आले असून महाराष्ट्रात आम्हाला भारतातील समृद्ध विविधतेचे दर्शन झाले, अशी भावना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राप्रति व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला 7 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात देगलूर (जि. नांदेड) येथून सुरुवात झाली होती. ही यात्रा आज बुलडाणा येथून मध्य प्रदेशात गेली. महाराष्ट्रातील यात्रा पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी यांनी बुलडाणा येथून महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र भूमी असलेल्या महाराष्ट्रातून आम्ही अतिशय नम्रतापूर्वक मध्य प्रदेशात जात असताना संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ, असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला देत आहोत. आपण दिलेले प्रेम, प्रचंड मोठा असा प्रतिसाद आणि आपण केलेले आदरातिथ्य याने आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळाली आहे, असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साईबाबा आणि गजानन महाराज तसेच येथील सर्व संताच्या विचारापासून प्रेरणा घेत आम्ही वाटचाल करणार आहोत. या संतांच्या विचाराने शेकडो वर्ष समतेचा, सामाजिक न्यायाचा, बंधुत्वाचा विचार दिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा तसेच भारत जोडो यात्रेचा हाच संदेश आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही नम्रपणे वाटचाल करत आहोत, असे राहुल यांनी म्हटले आहे.

यात्रेदरम्यान, आम्हाला अनेक ऐतिहासिक मंदिरांना गुरुद्वारांना भेटी देता आल्या. तसेच विठ्ठलाचे पाईक वारकरी, बौद्ध भिक्कू आणि सुफी संप्रदायातील लोक यांच्यासोबत चालताना मनस्वी आनंद झाला. आम्ही भगवान बिरसा मुंडा यांची 157वी जयंती देशातील इतर आदिवासी बांधवांप्रमाणे साजरी केली. इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी महिला शक्तींना घेऊन (शक्तीमार्च) महिला सन्मानाचा संदेश दिला तसेच या प्रसंगी हजारो आदिवासी महिलांशी संवाद साधता आला, हे आम्ही आमचे भाग्य समजतो, असे ते म्हणाले.

- Advertisement -

संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही अशा लोकांचे ऐकले जे कठोर परिश्रम करतात, परंतु त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे गंभीर झालेले प्रश्न, त्याची कारणमीमांसा करता असे लक्षात आले की, कृषी साहित्याच्या किमतीत झालेली प्रचंड भाववाढ, शेतमालाच्या भावात असलेली अनियमितता आणि फसलेली पीकविमा योजना यांनी शेतकऱ्याला गरिबीच्या दुष्टचक्रात ढकलेले आहे, हे पाहून मन व्यथित झाले. अनेक बेरोजगार युवक उच्चशिक्षण घेऊनही काम नसल्याने हतबल झालेले, आपल्या स्वप्नाचा चुराडा झालेले पाहिले, असे त्यांनी नमूद केले.

आदिवासी समुदाय हा या देशाचा मूलनिवासी आहे आणि त्याच्या अधिकारावर गदा आली आहे. वन हक्क जमीन 2006चा कायदा कशा पद्धतीने पायदळी तुटवला जात आहे, हे सुद्धा लक्षात आले. या सगळ्या समस्यांची कारणमीमांसा करताना असे लक्षात आले की, भाजपाच्या काही लोकांच्या हातामध्ये सत्ता आणि संपत्ती सीमित ठेवण्याचे धोरण याला कारणीभूत आहे. एका समुदायाला दुसऱ्या समुदायाच्या विरोधात संस्कृती, धर्म, जात आणि भाषा याचा वापर करून उभे करून संघर्ष उभा करण्याच्या भाजपच्या नीतीमुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

महाराष्ट्राचा पुरोगामी विचार हा नेहमी शाहू, फुले, आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हा राहिलेला आहे. हा जाज्वल्य विचार देशाला नेहमी दिशा देत राहिला आहे. हा विचार टिकवण्याचा प्रयत्न अनेक नागरी समुदाय, पुरोगामी विचारांचे कलाकार, साहित्यिक, सिनेक्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र हे करत आहेत आणि त्यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आहे त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी राहिन, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -