Homeमहाराष्ट्रAaditya Thackeray : साहजिकच उत्तीर्ण होऊनही..., ठाकूर कॉलेजच्या घटनेवरून आदित्य ठाकरेंचा टोला

Aaditya Thackeray : साहजिकच उत्तीर्ण होऊनही…, ठाकूर कॉलेजच्या घटनेवरून आदित्य ठाकरेंचा टोला

Subscribe

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील ठाकूर महाविद्यालयात झालेल्या घटनेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. देशात लोकशाही राहावी, असे या राजवाटीला वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Students Vs BJP : भाजपा नेत्याच्या भाषणासाठी महाविद्यालयाची सक्ती, विद्यार्थ्यांचा विरोध

कांदिवली येथील ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीएमएम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची ओळखपत्रे ताब्यात घेऊन कॉलेजच्या संकुलात भाजपासाठी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या चर्चासत्राला उपस्थित राहण्याची सक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येते. इमारतीच्या 7व्या मजल्यावर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते आणि हे चर्चासत्र अर्ध्यावर सोडून विद्यार्थी निघून जातील म्हणून महाविद्यालय व्यवस्थापनाने दरवाजांना बाहेरून कुलूप लावले होते. असे ‘फ्री प्रेस जर्नल’ या इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे.

महाविद्यालय व्यवस्थापनाच्या या वर्तनाविरोधात आवाज उठवण्याचे धाडस करणाऱ्या एका विद्यार्थ्यालाही गप्प बसवण्यात आले. शेवटी त्याने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्याच. गोयल हे तेथून निघून गेल्यावर, मुख्याध्यापक मंचावर आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या असहकार्याबद्दल फटकारले, असेही या विद्यार्थ्यांनी सांगितले. याबाबत महाविद्यालय व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारची टिप्पणी करण्यात आलेली नाही.

हेही वाचा – Arvind Kejriwal : ही कसली नैतिकता? केजरीवालांच्या मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस नेत्याचा प्रश्न

यावरून राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. देशातील राजवट रोज जगाला संदेश देत आहे की, यापुढे देशात लोकशाही राहावी, अशी त्यांची इच्छा नाही, असे सांगून आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आयडी जप्त करून, त्यांना परीक्षेच्या एक दिवस आधी, उत्तर मुंबईतील भाजपा उमेदवाराच्या मुलाच्या भाषणास उपस्थित राहण्यास भाग पाडले. कारण साहजिकच उत्तीर्ण होऊनही या सरकारकडे नोकऱ्या कुठे आहेत? या प्रकाराबद्दल प्राचार्यांना निलंबित केले जाईल का?

ठाकरे गट संतप्त

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. देशात लोकशाहीचा गळा घोटू पाहणाऱ्या भाजपाचा बुरखा ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी टराटरा फाडला आहे. विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करुन परीक्षेच्या आदल्या दिवशी त्यांना हजेरीची सक्ती करणाऱ्या या पक्षाच्या हाती देशाचे भवितव्य कसे सुरक्षित असेल? असा सवाल या पक्षाने केला आहे.

हेही वाचा – ED : ईडी कमालीची सक्रीय; विरोधी नेत्यांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर छापेमारी