विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीत तब्बल १८ वर्षांनी सत्तांतर घडले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. अभिजीत पाटील यांनी भागीरथ भालके यांचा पराभव केला आहे. (abhijeet patil won Vitthal co-operative sugar factory after 18 years)
अभिजीत पाटील यांच्या ताब्यात आणखी चार साखर कारखाने आहेत. तसेच, त्यांनी २० वर्षांपासून बंद असलेला सांगोला सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर घेऊन ३५ दिवसांत तो सुरू केला. यामुळे मतदारांनी अभिजीत पाटील या नवख्या उमेदवाराला मत देऊन निवडून आणले.
म्हणजेच, अभिजीत पाटील यांच्या ताब्यात आता पाच साखर कारखाने आले आहेत. हा कारखाना ज्याच्या हाती येतो तो संपूर्ण तालुक्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवतो असं म्हटलं जातं. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीचे भागीरथ भालके तिसऱ्या क्रमांकावर गेले असून तर, राष्ट्रवादीचेच युवराज पाटील दुसऱ्या क्रमाकांवर गेले आहेत.
दोन दिवसांपासून या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे युवराज पाटील यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.