समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजपच्या राहुल नार्वेकरा यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदनपर भाषणकरत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर, तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याच्या निर्णयावर भाष्य केले. या मुद्दयावरून त्यांनी ठाकरेंवर सरकारवर टीका केली.
जाता जाता उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलून टाकले. देशाचा महाराष्ट्राचा विकास होत असेल तर मला काही आक्षेप नाही. शहरांची नावे बदलून काय संदेश देणार आहात? मुस्लिमांची नावे बदलून काय संदेश दिला जात आहे. बाळासाहेबांच्या नावे मोठी शहरे बनवा, आम्ही टाळ्या बाजवून स्वागत करु. पण मुस्लिमांची नावे बदलून काय म्हणायचे आहे?, असा प्रश्न अबू आझमींनी केला.
भास्कर जाधव काय म्हणाले –
यावर शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी आक्षेप घेत औरंगजेब अतिरेकी होता, त्याने आमच्यावर अत्याचार केला म्हणून नाव बदलून संभाजी महाराजांचे नाव दिले आहे. मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नाही इतकंच सांगायचे आहे, असे भास्कर जाधव म्हणाले.