भोकरदन : तालुक्यातील कुंभारी शिवारात रविवार रोजी तिसर्या पत्नीचा काटा काढण्यासाठी टँकर चालकासोबत मिळून अनोखी शक्कल लढवली. अपघातात पत्नीचा खून केल्याचा बनाव केला, पण अखेर अरोपीचे बिंग फुटले. कुंभारी पाटी ते बेलोरा या गावाजवळ 31 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या दरम्यान हा अपघात घडवून आणला होता. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गजानन रघुनाथ आढाव (वय 40 वर्षे) याचा लिहाखेडी(ता. सिल्लोड) येथील कविता साखळे (वय 29 वर्षे) हिच्या सोबत तिसरा विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर त्यांच्यात कडाक्याची भाडणे सुरू झाली. औरंगाबादमध्ये घर घेण्यासठी 5 लाख रुपये आण, असा मानसिक आणि शारीरिक छळ सासरकडच्यांनी केला. छळास कंटाळून कविताने 20 दिवसांपूर्वी हर्सूल येथील पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता, मात्र त्यानंतर नातेवाईकांनी समजूत घालून त्यांना परत एकत्र केले होते.
गजानन आढाव हा औरंगाबाद येथील विज वितरण कंपनीत लिपिक आहे तर त्याची मयत पत्नी कविता आढाव ही सिल्लोड येथील तहसिल कार्यालयात कोतवाल आहे. त्यांनी सिल्लोड अथवा औरंगाबाद येथे घर करणे आवश्यक होते, मात्र गजानन आढाव याने 27 डिसेंबर रोजी हसनाबाद येथे घातपात करण्याच्या इराद्याने घर भाड्याने घेतले असा मयताच्या नातेवकांनी आरोप केला आहे. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान गजानन आढाव याने कविता हिस आपल्याला बेलोरा येथील नातेवाईकांकडे जायचे आहे असे सांगून दुचाकीवर बसविले व रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान टॅक्टरचा अपघात घडवून आणला.
यामध्ये कविता जागीच ठार झाली, मात्र गजाननला मार लागला नाही. दुचाकीवरील कविताचा मृत्यू झाला अन् गजाननचा नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर कविताच्या घरच्यांनी तिच्या पतीविरोधात खुनाचा आणि सासू कोशल्याबाई आढाव, नणंद अरुणा नारायण जाधव, ताराबाई फारकडे, मीरा चव्हाण, शीला कोंडके, तेजस फरकाडे यांच्यावर घर खरेदीसाठी 5 लाख रुपये घेऊन ये म्हणून कविताचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला.
यानंतर मयताचा भाऊ सुनिल साखळे याच्या तक्रारीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात पती व टँकरचालकाविरुध्द 302 तर उर्वरित आरोपींविरुद्ध 498, 504, 506, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी गजानन आढाव याला अटक करण्यात आली असल्याची माहिती सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी दिली आहे.