लॉक डाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाने खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाईचा मोठा बडगा उगारला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १६१ गुन्हे दाखल झाले आहेत. अशी माहिती सायबर विभागाच्या वतीने देण्यात आली आहेसध्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे. महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण १६१ गुन्हे ९ एप्रिल २०२० पर्यंत दाखल झाले आहेत.
याठिकाणी दाखल झाले गुन्हे
राज्यभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील पुढील प्रमाणे
बीड २२, कोल्हापूर १३,पुणे ग्रामीण १२, मुंबई ११, जळगाव १०, जालना ९, नाशिक ग्रामीण ८, सातारा ७, , नांदेड ६ , नागपूर शहर ५ , नाशिक शहर ५, परभणी ५ ठाणे शहर ४, बुलढाणा ४, गोंदिया ३, भंडारा ३ , अमरावती ३, लातूर ३, नंदुरबार २, नवीमुंबई २, उस्मानाबाद २,हिंगोली १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ८९ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिकटॉक व्हीडिओ शेअर प्रकरणी ३ गुन्हे व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा गैरवापर केल्या प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ३६ आरोपींना अटक केली आहे .
कोल्हापूर, बीड, जालना, लातूर, जळगाव, परभणी , पुणे ग्रामीण ,या सर्व ठिकाणी नवीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे .या गुन्ह्यांमध्ये आरोपीनी आपल्या फेसबुक /व्हाट्सअँप व अन्य सोशल मीडियाचावापर करून कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या , ज्यामुळे त्या परिसरात अशांतंता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
मुंबई कुलाबामध्ये एक गुन्हा
मुंबईमध्ये काल कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर आरोपीने एका विशिष्ट मेडिकल स्टोअरच्या स्टाफला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे व त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने सदर दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करू नये अशा आशयाचा खोटा मेसेज व्हाट्सअँपद्वारे सगळीकडे पसरविला होता .
सध्याच्या कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात सोशल मिडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने व्हाट्सअँपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस ,फोटोज ,व्हिडिओज ,चुकीच्या पोस्ट्स पाठवून , तसेच महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स ,मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊनच माहिती पुढे पाठवावी अशी माहिती महाराष्ट्र सायबर सेलने जाहीर केली आहे.
हे ही वाचा – Lockdown – मुंबईसह राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना सुरूवात!