अनेक जातीयवाद्यांनी राज्यातील वातावरण गढूळ केले असून जाती जातींमध्ये मोठी तेढ निर्माण झाली आहे. मराठा, कुंभार, ब्राह्मण असे विविध जातींचे संघ निर्माण झाले आहेत. हे सर्व संपवून फक्त एकच हिंदू जात राहायला हवी, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनी केलेल्या समाजसुधारणेत ब्राह्मणांचाही वाटा मोठा होता. मात्र, जात संपविण्यासाठी ब्राह्मणांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही शरद पोंक्षे यांनी केले.
पुण्यात नुकतेच एका कार्यक्रमात पोंक्षे यांनी जातीयवादावर भाष्य करताना जातीयवाद्यांनी राज्यातील गढूळ केलेले वातावरण स्वच्छ करण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे मत व्यक्त केले. सावरकरांइतकेच मला बाबासाहेब आंबेडकरही प्रिय आहेत. सध्या मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अभ्यास सुरु केला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोंक्षे म्हणाले की, जात संपविण्यासाठी मागील १५ वर्षांपासून व्याख्याने देत आहे. मी ब्राह्मण असलो तरी मला जातीचा गर्व नाही. जात ही संपलीच पाहिजे. जात संपणे अशक्य असले तरी त्यासाठी प्रयत्न करु नये, असे म्हणून चालणार नाही. जात संपवण्यात कधीतरी यश मिळून आपले राज्य, देश जातमुक्त होईल.
नाट्य तसेत चित्रपट सृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवलेले शरद पोंक्षे हे ‘हे राम,नथुराम’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. गांधी विचारांना धक्का लावणारे हे नाटक आहे, अशी टीका अनेकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शरद पोंक्षे यांनी हे नाटक करणे थांबवले. मात्र अनेक व्याख्याने आणि चर्चासत्रातून ते त्यांचे विचार मांडताना दिसतात.