मुंबईः जगात जैवविविधता दिवस साजरा केला जातोय. तर आपले बैकायदा सरकार समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करत आहेत. पण सत्य हे आहे की नागरिक पर्यावरण व जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी आंदोलने करत आहेत. हे अवैध सरकार नागरिकांच्या विरोधात आहे, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन ही टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीटमध्ये पर्यावरण रक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती दिली आहे. पुणे येथील नद्यांची दुरवस्था, वेताळ टेकडी बचाव आंदोलन, मुंबईतील आरे बचाव आंदोलन, नागपूरचे अजनी वन, नांदगाव आंदोलन, रत्नागिरीतील रिफायनरी आंदोलन हा तपशील आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीटमध्ये दिला आहे.
Even as the world tweets about Biodiversity Day, and our illegal state regime indulges in beach clean ups for photo ops, the truth is that citizens are fighting to protect environment and biodiversity in the following places and the state regime is against the citizens in:
1)…— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 22, 2023
मुंबईतील जी-२० परिषदेच्या पर्यावरण कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर जुहू समुद्र किनाऱ्यावर रविवारी सकाळी भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यामध्ये, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
जी-२० परिषदेचे अध्यक्षपद यंदा भारत भूषवत आहे. याअंतर्गत देशातील विविध शहरांमध्ये विविध विषयांवर बैठकांचे आयोजन आहेत. २१ ते २३ मे दरम्यान मुंबईमध्ये पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाची (ईसीएसडब्ल्यूजी) बैठक होत आहे. याच पार्श्वभूमीवर जुहू समुद्रकिनारी भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याचे फोटो मुख्यमंत्री शिंदे यांनी सोशल मीडियावर टाकले होते.
स्वच्छता हे फार महत्त्वाचे कार्य आहे. संत ज्ञानेश्वर यांनी धरतीच्या कल्याणाचा संदेश दिला होता. आज याक्षणी आपणही संपूर्ण विश्व स्वच्छ ठेवण्याचा संदेश जगाला देवू या, राज्य सरकार पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी सातत्याने उपक्रम राबवत आहे. भारताला जी-२० चे अध्यक्षपद मिळणे ही तमाम भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे, अशी भावनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली होती. त्यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन टीका केली.