मुंबई – आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी दहीहंडी फोडली. सर्वांच्या आशीर्वादाने हे सरकार अस्तित्वात आले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांना उत्तर दिले आहे. यावेळी तुम्ही 50 थर लावले की थरकाप झालाय हे सर्वांना माहित आहे. किमान आजच्या सणाच्या दिवशी तरी राजकारण नको, अशी टीका आदित्य ठाकरे यानी केली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले –
कुणी किती थर लावले यात मला पडायचे नाही. ५० थर लावले की थरकाप उडालाय हे सर्वांना माहित आहे. किमान आजच्या दिवशी तरी सणात राजकारण नको. कारण प्रत्येक ठिकाणी राजकारण आणण्याची काही गरज नसते. २४ तास राजकारण करत राहिलं तर सणांचं महत्व तरी काय? त्यामुळे मला त्यात पडायचं नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
पुढे आजचा दिवस सणाचा दिवस आहे. मला प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज वाटत नाही. ठिक आहे आम्ही हिंदुत्वविरोधी असू तुमचे धर्मावर जास्त प्रेम असेल तर तुम्ही सणात राजकारण आणणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्यात. आज सण आहे तो सणासारखा साजरा होऊ देत, असे आदित्य ठाकरे म्हणाले
मुख्यमंत्री काय म्हणाले –
ठाण्यातील टेंभी नाका येथे दहीहंडी उत्सवाला आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी उपस्थित गोविंदांना संबोधित करताना दीड महिन्यापूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली आणि ५० थर लावले, अशी टीका नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले.