गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगली ढवळून निघालं आहे. संपूर्ण देशाचं लक्ष आजही महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आहे. शिंदेगटाच्या बंडखोरीनंतर अखेर एकनाथ शिंदे यांना भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री पद मिळालं. तसेच नुकतेच आता शिवसेनेतील काही नगरसेवक सुद्धा शिंदेगटात सामील झाले. या सगळ्या घडामोडींवरून अनेक पक्षातील नेते वारंवार आपल्या प्रतिक्रिया मांडत असतात. अशातच आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने आपल्या पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवरून आदित्य ठाकरेंना त्यांच्या जुन्या वक्तव्यावरून चिमटा काढला आहे.
मनसेच्या फेसबुक पेजवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एक फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोवर कॅप्शन लिहिलंय की, “नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘संपलेला पक्ष’ म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज ‘पक्ष नसलेला’ माणूस झाले आणि चिन्ह देखील गमवण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले! म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये! #शिल्लकसेना”, अशी पोस्ट मनसेकडून शेअर करण्यात आली आहे.
खरंतर, याआधी आदित्य ठाकरे यांनी मनसेला भाजपची सी टीम असं म्हणत हिणवलं होतं, त्यावेळी ते म्हणाले होते की, “मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडं काम मिळालं आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे. जो पक्ष गेली इतकी वर्ष आपली भूमिका स्पष्ट करु शकला नाही त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं, संपलेल्या पक्षांवर मी उत्तरं देत नाही.” असा टोला त्यांनी मागे मनसेला लगावला होता.
त्याचेच प्रत्युत्तर देत आता मनसेने आदित्य ठाकरेंना टोला लागावलेला आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपला पक्ष मजबूत करण्यासाठी सक्रिय झाले आहेत.