1 मे पासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे. शिर्डी ग्रामस्था हा बंद पाळणार आहेत. शिर्डी ग्रामस्थांचा CISF नियुक्तीला विरोध केला आहे. त्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे. साई मंदिरात CISF सुरक्षा नियुक्त करु नये, अशी शिर्डीतील ग्रामस्थांची मागणी आहे. CISF सुरक्षेमुळे भाविकांसह ग्रामस्थांना त्रास होणार असल्याचं शिर्डीकरांचं म्हणणं आहे. साई संस्थानला सध्या स्वत:च्या सुरक्षा रक्षकांसह महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा आहे. अशात संस्थानकडे अगोदरच दुहेरी सुरक्षा व्यवस्था असताना केंद्रीय सुरक्षा का? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत. बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरु राहणार आहे. CISF सुरक्षेला विरोधासह इतर काही मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थ एकवटले आहेत. ( Ahmednagar news Shirdi Indefinite bandh from 1 May CISF sai baba mandir )
नेमकं प्रकरण काय?
शिर्डी मंदिराला वारंवार धमक्या येत आहेत. त्यामुळे शिर्डीतील साई मंदिराला महाराष्ट्र पोलीस, संस्थेचे सुरक्षा रक्षक, कमांडो, बॉम्बशोधक पथकासह विविध प्रकारची सुरक्षा दिलेली आहे. मात्र, ही सुरक्षा कमकुवत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि साईबाबा संस्थानला केंद्रीय सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
यावर न्यायालयाच्या निर्देशानंतर संस्थानने केंद्रीय सुरक्षा लागू करण्यास तयारी दाखवली आहे. मात्र, शिर्डीतील नागरिकांनी या निर्णयास विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. नुकतेच शिर्डीतील नागरिकांनी हुनमान मंदिराजवळ भिक मांगो आंदोलन केले.
( हेही वाचा: राजपुत्र अमित ठाकरे नाशिकला आले, बैठक घेतली अन् परतले; गुप्त दौऱ्याचे रहस्य काय? )
मागण्या काय?
साईबाबा संस्थानला सीआयएसएफ अर्थात केंद्रीय सुरक्षा बल यंत्रणा नको. संस्थानचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयएएस ऐवजी प्रांताधिकारी दर्जाचा अधिकारी असावा, साई संस्थान विश्वस्त मंडळात स्थानिकांना 50 टक्के आरक्षण असावं, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र दिनापासून बेमुदत शिर्डी बंदची हाक देण्यात आली आहे.