मी खासदार नवनीत राणा यांचे समर्थन करत नाही. परंतु नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मग मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळे काय केले आहे? त्यांच्याविरुद्ध इतकी साधी कलमे का लावण्यात आली आहेत? याचे मला ठाकरे सरकारने उत्तर द्यावे. राज ठाकरेंनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे चिथावणीखोर वक्तव्य केले असल्याने त्यांच्याविरोधातही राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.
औरंगाबाद येथील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर जलील मंगळवारी माध्यमांना प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, राज ठाकरे यांच्यावर १५३, ११६, ११७, १७५ ही कलमे लावण्यात आली आहेत. कायद्याच्या जाणकारांच्या मते ही खूप सौम्य कलमे आहेत. यात सहज जामीन मिळू शकेल. यापेक्षा भादंवि १२३ पेक्षा भादंवि १५३ अ लावले असते. तर योग्य झाले असते. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे हाच त्या सभेचा उद्देश होता. एखाद्या नेत्याने स्टेजवर उभे राहून एका कोपर्यात गडबड झाल्यावर त्यांना तिथेच मारा असे सांगणे चुकीचे आहे. तिथे कुणाला मारले असते तर कोण जबाबदार असते, असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्र्यांना कदाचित असे वाटत असावे की माझा भाऊ आहे. मी त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करू? राष्ट्रवादीला असे वाटत असावे की राज ठाकरेंसोबत भविष्यात जावे लागेल, तर त्यासाठी आत्ता त्यांच्यावर गंभीर कलमे लावली जाऊ नयेत? केवळ दिखावा करण्यासाठी त्यांच्यावर थातुरमातुर कलमे लावल्याचा आरोपही जलील यांनी केला.