राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याच्या २०२२ -२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पात पर्यटन विभागावर अधिक भर देण्यात आला आहे. पर्यंटन विभागासाठी एकूण १४०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक आणि थोर समाजसुधारकांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने मुंबई, पुणे आणि नागपूर येथे स्वातंत्र्य लढ्याशी निगडीत स्थळांचा हेरिटेज वॉक तयार करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार या निसर्गरम्य या ठिकाणास पर्यटन स्थळाचा ब वर्ग दर्जा देण्यात आला असून तिथे तसेच फर्दापूर जिल्हा औरंगाबाद येथील जमीनाचा विकास करून पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
स्काय वॉक आणि आवश्यक पर्यटन सुविधा निर्माण करणार
अजिंठा, वेरूळ, महाबळेश्वर या पर्यटन स्थळांचा एकात्मिक विकास आराखडा तयार करून त्या स्थळांचा सर्वांगिण विकास करण्याचे ठरवण्यात आले असून अजिंठा, वेरून या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळावर आधुनिक, सामूहिक सुविधा केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. लोणावळा येथील टायगर पॉईंटवरून दिसणारे विहंगम दृश्य पर्यटकांमधे लोकप्रिय आहे. तेथे स्काय वॉक व इतर आवश्यक पर्यटन सुविधा निर्माण करण्यात येतील.
रायगड किल्ला आणि परिसर विकासासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध
रायगड किल्ला आणि परिसर विकासासाठी सन २०२२-२३ मध्ये १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी रूपये आणि मुंबईतील शिवडी आणि सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी सन २०२२-२३ मध्ये ७ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले, गनिमीकावा यांना जागतिक वारसा दर्जा-छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युद्ध पद्धतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे सविस्तर प्रस्ताव दाखल करण्यात येत आहे.
कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर विकास आराखडयाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाकरीता २५ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. वढा, जि. चंद्रपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील विकास आराखड्याला मान्यता देऊन २५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम १२ मार्च २०२१ पासून सुरु झाला आहे. कार्यक्रमांच्या आयोजनात देशात महाराष्ट्र आघाडीवर असून त्यासाठी ५०० कोटी रूपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. गेट वे ऑफ इंडिया वास्तुवर महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव दर्शविणारामराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतीलध्वनीप्रकाश कार्यक्रम करण्याचे प्रस्तावित आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्य सरकारने स्वातंत्र्य सैनिकांना निवासी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी मासिक उत्पन्नाची १० हजार रुपयांची मर्यादा ३० हजार रुपये केली आहे.
सांस्कृतिक कार्य
महावारसा सोसायटी – राज्यात ३७६ संरक्षित आणि सुमारे १ हजार ५०० असंरक्षित पुरातत्व स्मारकांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी अशासकीय आर्थिक स्रोत निर्माण करुनत्यांच्या संवर्धन आणि व्यवस्थापनाबाबत स्थानिक रहिवाशांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण व्हावी म्हणून जिल्हानिहाय महावारसा सोसायट्या स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
अमृत महोत्सवी वंदे मातरम्- हैद्राबाद मुक्ती संग्रामातसहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद येथे अमृत महोत्सवी वंदे मातरम् सभागृहांचे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठीएकूण ४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सन २०२२-२३ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता पर्यटन विकासासाठी १ हजार ७०४ कोटी व सांस्कृतिक कार्य विभागाला १९३ कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
हेही वाचा : Elon Musk झाला सातव्यांदा बाबा; नव्या चिमुकलीचं ठेवलं अजब नाव