घरताज्या घडामोडीभीती वाटत असती तर पटोलेंनी राजीनामाच दिला नसता, सरकार विधानसभा अध्यपदाच्या निवडणुकीचे...

भीती वाटत असती तर पटोलेंनी राजीनामाच दिला नसता, सरकार विधानसभा अध्यपदाच्या निवडणुकीचे आव्हान पेलणार – अजितदादा

Subscribe

विधानसभा अध्यक्ष निवडीला सरकार म्हणून आमच्यापैकी कुणीही घाबरत नाही. आम्हाला भीती वाटली असती तर विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामाच दिला नसता, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. नाना पटोले यांना कॉंग्रेसच्या हायकमांडने राजीनामा द्यायला सांगितले होते. जर आम्हाला विश्वास नसता तर ही रिस्कच घेतली नसती असे अजितदादा म्हणाले. नाना पटोले यांनी राजीनामा देताना कॉंग्रेसनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशीही संवाद साधला होता. त्यामुळे आम्हाला भेटूनच राजीनामा दिला असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. सरकारला सद्यस्थितीला धोका नाही, म्हणूनच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीची रिस्क घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारला कोणताही धोका नाही

आज राज्य सरकारमध्ये सरकारला बहुमत आहे. सरकारला १७० आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे सरकारला सद्यस्थितीला कोणताही धोका नाही. विरोधकांकडून आतापर्यंत अनेकदा सरकार पडण्याची डेडलाईन देण्यात आली होती. पण आता प्रत्यक्षात सव्वा वर्षे झाले असतानाही महाविकास आघाडी सरकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उत्तमपणे काम करत आहे. अनेकदा जेष्ठ नेते शरद पवारांचेही मार्ग दर्शन असते. कॉंग्रेससोबतही घटक पक्षांचा चांगला संवाद आहे. त्यामुळे सगळे जण चर्चा करूनच सरकार चालवत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अर्थसंकल्पात जनतेवर नव्या करांचा बोजा

प्रत्येक तीन महिन्यात सरकार पडेल असा दावा विरोधकांनी अनेकदा केला. पण सरकार अतिशय व्यवस्थीतपणे काम करत आहे. येत्या दिवसांमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनतेवर काही करांची वाढ होऊ शकते. तर काही कर हे इंधनाच्या बाबतीत कमी होऊ शकतात असेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसातच अमरावतीसारख्या ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यामुळे इंधनाचा दर कमी व्हावा अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. पण राज्य सरकारवर असणारा कर्जाचा बोजा पाहता काही गोष्टींसाठी कर वाढवावे लागतील असे ते म्हणाले. अनेकदा राज्याला केंद्राचा पैसा यावा लागतो. तर काही पैसा टॅक्स रूपाने यावा लागतो. तेव्हाच राज्य सरकारचे आर्थिक कामकाज सुरळीतपणे सुरू राहते असे अजितदाद म्हणाले.

पूजा चव्हाण प्रकरणात तपास योग्य दिशेने

पूजा चव्हाण प्रकरणात तपास अतिशय योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिस सत्य शोधतीलच असे अजितदादा म्हणाले. संजय राठोड यांची येत्या दिवसांमध्ये भेट झाल्यास त्यांना प्रसारमाध्यमांशी बोलायला नक्कीच सांगेन असेही अजितदादांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. या प्रकरणात आई वडिलांचा जबाब नोंदवण्यात आला असून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचेही अजितदादा यांनी यावेळी सांगितले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -