लातूर : सत्तासंघर्षाचा निकाल आज (11 मे) कोणत्याही क्षणी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे 16 आमदार अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असे कायेदतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले असतानाच पुन्हा एकाद अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) एकत्र दिसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या बंडखोरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज काही वेळातच निर्णय लागणार आहे. परंतु त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार राज्यातील सत्ताधारी आघाडीतील प्रमुख नेत्यांसोबत दिसल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार बुधवारी लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार अभिमन्यू पवार यांच्या मुलाच्या लग्न समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसले. या विवाह सोहळ्याला शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते.
गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे काही आमदारांसह अचानक थेट गुजरातला निघून गेले. ते का निघून गेले. त्याचे कारण काय, याची चर्चा सुरु झाली. अखेर भाजपच्या मदतीने शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याचे स्पष्ट झाले. तेथून शिवसेना फुटीचा प्रवास सुरु झाला. शिवसेनेचा एक एक आमदार शिंदे यांच्या गटात सामील होत होता. त्याचवेळी महाविकास आघाडीने मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीचा व्हीप जारी करण्यात आला. या बैठकीला एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले 16 बंडखोर आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची नोटीस जारी करण्यात आली. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी ही नोटीस जारी केली. त्याचदरम्यान 16 बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस जारी केली.
या दोन्ही नोटीसचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला. त्यावर सुनावणी सुरु असतानाच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. तेही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचले. याच गोंधळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. सत्तासंघर्षाचा निकाल आज कोणत्याही क्षणी लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे या सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले.