घरमहाराष्ट्रमी कुठल्याही महापुरुषांबद्दल चुकीचं बोललो नाही, अजित पवार त्या वक्तव्यावर ठाम

मी कुठल्याही महापुरुषांबद्दल चुकीचं बोललो नाही, अजित पवार त्या वक्तव्यावर ठाम

Subscribe

छत्रपती शिवाजी महापुरुषांबाबत बोलताना आजवर मी कुठल्याही महापुरुषाबद्दल, स्त्रियांबद्दल चुकीचं बोललो नाही. मला भाजपने विरोधी पक्ष नेते पद दिले नाही, मला राष्ट्रवादीचे विधानसभेचे ५३ आमदार आहेत, त्यांनी हे पद दिले आहे. मला पदावर ठेवायच की नाही हा राष्ट्रवादीच्या आमदारांचा अधिकार आहे. बाकीच्यांना ती मागणी करण्याचा काडीचा अधिकार नाही, म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून सुरु असलेल्या वादावर पडदा पाडला आहे.

अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करण्याचे भाजपचे आदेश 

अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महापुरुषांबाबत बोलताना आजवर मी कुठल्याही महापुरुषाबद्दल, स्त्रियांबद्दल चुकीचं बोललो नाही. महामोर्चा काढण्यात आला होता त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपुरुषांचा अपमान केला होता, त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं होते. जे शब्दप्रयोग त्यांनी वापरायला नाही पाहिजे होते ते वापरले होते. कालचे दोन दिवसांपासून भाजपने त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांना आदेश दिले की, तुम्ही अजित पवार यांच्याविरोधात आंदोलन करा आणि अजित पवारांचा राजीनामा मागा. मला भाजपने विरोधी पक्ष नेते पद दिले नाही, मला राष्ट्रवादीचे विधानसभेचे ५३ आमदार आहेत. त्यांनी हे पद दिले आहे. त्यामुळे त्यांना मला पदावर ठेवायच की नाही हा राष्ट्रवादीच्या आमदारांचा अधिकार आहे. बाकीच्यांना त्याच मागणी करण्याचा काडीचा अधिकार नाही, असंही अजित पवारांनी भाजपला ठणकावून सांगितले आहे.

- Advertisement -

भाजपने योजनपूर्वक आंदोलन केले

भाजपच्या मंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, कार्यकर्त्यांनी मला फोन करुन सांगितलं की, अजित दादा चुकीचे बोलले म्हणून  आम्हाला आंदोलन करण्यास सांगितले जात आहे. त्यांनाही कळेना मी काय चुकीचे बोललो. भाजपने या आंदोलनाचा काय पॅर्टन असला पाहिजे हे सांगितला होता. ज्यात अजित पवारांविरोधातील बॅनरवरील फोटोवर फुली मारायची आणि बाकीचा मायना वैगरे सगळा त्यांना पाठवला होता. त्याचा फोटो काढून तो भाजप ऑफिसला पाठवण्यास त्यांना सांगितलं होतं. अशापद्धतीने भाजपने आंदोलन केलं, असंही अजित पवार हसत हसत म्हणाले.

आंदोलन करणाऱ्यांना मला विचारायचं आहे की, महापुरुषांचा अपमान हा शब्दप्रयोग वापरून बेताल वक्तव्य राज्यपालांनी केल आहे. त्यांच्या मंत्र्यांनी केला आहे. तर भाजपच्या मंत्र्यानीच छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा मुख्यमंत्र्यांना दिली. भाजपच्या मंत्र्यांनी, आमदारांनी आणि राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास भाजप तयार नाहीत. वक्तव्य करणारे माफी मागण्यास तयार नाहीत, दिलगिरी व्यक्त करण्यास तयार नाहीत, असही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

भारतीय संविधानात प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यासंदर्भात व्यक्तिस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी बोलत असताना पवारांनी साहेबांनी सांगितलेली गोष्ट माझ्या पाहण्यात आली की, स्वराज्य रक्षक म्हणावे हीच माझी भूमिका आहे, कोणी धर्मवीर म्हणत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य बारमतीत की कुठेतरी केलं. याबाबत आपली भूमिका मांडण्याचे काम इतिहास संशोधकांनी केलं आहे.

म्हणून स्वराज्यरक्षक म्हणावे – अजित पवार

सुरुवातीला माझी भूमिका हीच होती की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापन केली, स्वराज्य निर्माण केलं, शिवाजी महाराजांनंतर तिथे छत्रपती संभाजी महाराजांनी त्या सर्व स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम केलं, ज्यावेळी स्वराज्याचं रक्षण करतो असं म्हणतो त्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात. स्वराज्यात सगळ्या जाती धर्माची लोकं राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं, आणि त्या स्वराज्याचं रक्षण छत्रपती संभाजी महाराजांनी केलं, त्यामुळे त्यांना स्वराज्यरक्षक म्हणणे हेच व्यापक आणि अर्थपूर्ण आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

असा मी कोणता गुन्हा केला

असा मी कोणता गुन्हा केला किंवा कुठलं चुकीचं बोललोय की ज्यातून महाराजांचा अपमान झाला. यासंदर्भात माझ्याकडे राजीनामा मागण्याऐवजी ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे, त्यांच्याबद्दल आंदोलकांच काय मत आहे, स्पष्टपणे राज्याला सांगितलं पाहिजे. नेहमीप्रमाणे मीडियानेही अजित पवार दिसेना, कुठे गेलेत, एवढी का तुम्हा सगळ्यांना माझी आठवण येते मला काही समजलं नाही. प्रेम आहे मान्य आहे पण मला वैयक्तिक आयुष्य आहे की नाही, असंही अजित पवार म्हणाले.

त्या भूमिकेवर मी ठाम आहे 

उद्या कोणीपण काही पण बोलणार, ज्यांच्या वक्तव्यावर मी उत्तर द्यावं, अशापण व्यक्ती त्यांच्यात नाही तर मी त्यांच्या तोंडाला लागण्याचं काय कारण आहे. मला माझी भूमिकाचं तुमच्यासमोर मांडणार, स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांबद्दल माझी जी भूमिका आहे ती मी विधानसभेत मांडली आहे. असं म्हणत अजित पवारांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे म्हटले आहे. इतिहासातील वाचन आणि आकलन यांच्याआधारे जी भूमिका तयार झाली ती विधानसभेत मांडली असही अजित पवार म्हणाले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -