राज्यात कोरोना व्हायरसचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. तर बारामतीत देखील कोरोनाग्रस्तांची संख्या सहावर गेली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बारामतीत ‘भिलवाडा पॅटर्न’ राबविण्याचा निर्णय खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.
असा असणार बारामतीतील ‘भिलवाडा पॅटर्न’
राजस्थानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्याप्रमाणे लॉकडाऊन करुन नियंत्रण मिळवण्यात आले. त्याप्रमाणे बारामतीत देखील, असे लॉकडाऊन करण्याची वेळ आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे आता बारामतीत प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही चाचणी एकदाच केली जाणार नाही. तर तीन वेळा चाचणी केली जाणार आहे. याकरता एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणे असणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच जीवनाश्यक वस्तू लोकांनी घराबाहेर पडून आणण्यापेक्षा त्यांना घरपोच पुरवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असा भिलवाडा पॅटर्नमध्ये समावेश असणार आहे.
हेही वाचा – शरद पवार, संजय राऊत यांच्याकडून राज्यपालांची पंतप्रधानांकडे तक्रार
काय म्हणाले अजित पवार?
‘बारामतीत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असले तरी देखील बारामतीतील लोकांनी घाबरुन जाऊ नये. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्या आहेत, त्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच कोरोनाबाधितांचा आकडा वाढू नये, यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहेत’.
बारामतीकरांनो स्वयंशिस्त महत्त्वाची
बारामतीकरांनो स्वयंशिस्त पाळावी. रस्त्यावर कोणीही विनाकारण बाहेर येऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. पोलीस प्रशासनावर विनाकारण ताण येऊ नये, याची काळजी बारामतीकरांनी घेत प्रशासनास सहकार्य करण्याचे काम करावे, अशी विनंतीही पवार यांनी केली आहे.
हेही वाचा – करोनाचे संकट तरीही कोकणचा राजा थेट ग्राहकांपर्यंत पोहचला