राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नावांची यादी राज्य सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे नोव्हेंबर २०१९ रोजी सोपवली आहे. राज्यपालांनी ७ ते ८ महिने झाले तरी राज्यपाल नामनिर्देशित यादिवर अद्याप काही निर्णय घेतला नाही आहे. न्यायालयानेही राज्यपालांना यावर उत्तर देण्यास सांगितले होते. यानंतर आता हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारचे शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये झालेल्या चर्चेत अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तिचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील ज्वलंत विषय असणाऱ्या मराठा आरणक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. तसेच यासोबत राज्यातील अन्य राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा मांडला आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकार रीतसर सत्तेमध्ये आले असून मंत्रिमंडळाच्या ठरावानंतर यादी राज्यपालांना पाठवण्यात आली आहे. परंतु अनेक महिने झाले असून राज्यपालांनी या यादीवर निर्णय घेतला नाही आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना यामध्ये लक्ष घालून राज्यपालांना सूचना द्याव्यात अशी विनंती केली असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांना सुचना देण्यात आल्या असून निर्णय घेतला नसल्याचे मोदींना सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यपाल त्या १२ आमदारांच्या यादीवर स्वाक्षरी करणार का? तसेच हा मुद्दा निकाली लागणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला मिळणाऱ्या जीएसटी परताव्याबाबत चर्चा केली असून थकीत जीएसटी रक्कम तातडीने राज्याला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.