कोरोना लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत त्यांना आता बाहेर पडण्याची परवानगी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. याबाबत मी दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात निर्बंध लागू आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर दोन डोस घेतलेल्यांना आता बाहेर पडण्याची परवानगी मिळणार का हे पाहावं लागेल.
अजित पवार आज सकाळी पिंपरी-चिंचवडमध्ये होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लसीकरणावर भाष्य केलं. राज्यात लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना टप्प्याटप्प्याने बाहेर पडण्याची परवानगी दिली पाहिजे असं माझं वैयक्तीक मत आहे, असं अजित पवार म्हणाले. यासंदर्भात मी परवा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, असं देखील अजित पवार यांनी सांगितलं.
लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला
लोकसंख्येच्या प्रमाणत लस मिळायला हवी, लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. केंद्राने जुलैमध्ये लस मिळेल असं सांगितलं होतं. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही, असं सांगतानाच पूर्वी लस घेण्यापासून लोक कचरत होते. आता लोक लस घेऊ लागले आहेत. लोकांची मानसिकता बदलली आहे. ही सकारात्मक बाब आहे, असं अजित पवार म्हणाले.