राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ईस्टर संडे’निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून भगवान येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा हा दिवस आपल्या जीवनात आनंद घेऊन येईल. मानवतेच्या सेवेसाठी प्रेरीत करेल असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. ‘ईस्टर संडे’ म्हणजेच ‘पुनरुत्थान दिन’, भगवान येशू ख्रिस्त हे ‘ईस्टर संडे’ दिवशी मृत्यूवर मात करुन पुनरुत्थित झाले होते. यानिमित्ताने त्यांचं स्मरण करत असताना आपणही ‘कोरोना’वर मात करण्याचा निर्धार करुया. भगवान येशू ख्रिस्तांच्या दया, प्रेम, क्षमा, शांती आणि मानवतेच्या सेवेची शिकवण अंगिकारण्याचा प्रयत्न करुया, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ईस्टर संडे’निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे. यावेळी त्यांनी ३० एप्रिलपर्यंत सर्वांनी सहकार्य केल्यास, पुन्हा लॉकडाऊन वाढवावं लागणार नाही, असं म्हटलं. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि प्रसार रोखण्यासाठी राज्यातलं लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याचं सांगून नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
हेही वाचा – नेपाळच्या मशिदीत लपले २४ तबलीगी, अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं
राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. तिथला संसर्ग रोखण्यासाठी संबंधित गावे, वाड्या, वस्त्या, सोसायट्या सील केल्या जात आहेत. यामुळे सध्या गैरसोय होत असली तरी लोकांचा जीव वाचवण्यासाठी हे आवश्यक आहे. आपला व आपल्या कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सरकारने लॉकडाऊन वाढवलं आहे. लोकहितासाठी घेतलेल्या ३० एप्रिलपर्यंतच्या लॉकडाऊनला राज्यातील जनतेने सहकार्य करावं. प्रत्येकाने घरातच थांबावं, डॉक्टर, पोलिस, शासकीय यंत्रणांना सहकार्य करावं. हे लॉकडाऊन यशस्वी झालं तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन वाढवावं लागणार नाही याचा विचार करुन राज्यातल्या प्रत्येकानेच कोरोनावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.