“जगात आमचा पक्ष मोठा आहे, असे भाजपवाले (BJP) एकीकडे सांगतात आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष महिलांबाबत पुण्यात अपशब्द वापरतात. आम्ही ग्रामीण भागातून आलो आहोत. आम्हालाही बरेच काही बोलता येते. ‘भ’ ची भाषा आम्ही सुरू केली तर पळून जाण्याची वेळ येईल, पण आम्ही त्या स्तरावर जाणार नाही”, असा चिमटा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी काढला आहे. तळेगाव नगरपरिषद इमारतीचं आज अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर बोलताना भाजपवर निशाणा साधला.
माजी आमदार बाळा भेगडे (Bala Bhedge) यांचं नाव घेता पवारांनी मावळमध्ये निशाणा साधला. ते म्हणाले की, “मावळात कित्येक वर्षे राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नव्हता, याची खंत होती. मात्र, सुनील शेळकेंच्या (Sunil Shelke) माध्यमातून सगळा अनुशेष भरून निघाला. आघाड्यांऐवजी सर्व स्थानिक निवडणुका यापुढे घड्याळाच्या चिन्हावर लढवाव्यात. तळेगाव, वडगाव, लोणावळा यासह जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या १२ जागा निवडून द्या. मग महत्त्वाची पदे मावळात देऊ, अशी ग्वाही अजित पवारांनी यावेळी दिली. तुमचा यापूर्वीचा आमदार राज्यमंत्री होता. तरीही तालुक्यासाठी निधी आणता आला नाही. निधी आणण्यासाठी अक्कल असावी लागते. पाठपुरावा करावा लागतो. ते त्यांना जमले नाही.”
सध्या राज्यात धर्मावरून सुरु असलेल्या वादावरही अजित पवारांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले की, “प्रत्येकाने आपल्या जाती, धर्माचा अभिमान जरूर बाळगावा. मात्र, दुसऱ्याला त्रास होईल, असे काही करू नये. कोणताही धर्म चुकीचे वागा, असे सांगत नाही. सर्व जाती, धर्मातील मावळे एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून कल्याणकारी राज्य केले, हा इतिहास आहे. नेमका तोच विसरून नको त्या गोष्टी केल्या जात आहेत. लोकशाही, राज्यघटना टिकवण्याचे सर्वांपुढे आव्हान आहे. देशाच्या एकतेला धक्का बसता कामा नये.”