राज्यात किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्याच्या निमित्ताने यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पात 100 कोटी रूपयांची तरतूद करून देण्यात आली आहे. तर छत्रपति शिवाजी महाराजांचे किल्ले आणि त्यांच्या गनिमी कावा युद्ध पद्धतीला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच महापुरूषांच्या शाळांच्या सक्षमीकरणासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी भरीव तरतूद
रायगड किल्ला व परिसर विकासाकरीता सन 2022-23 मध्ये 1०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. राजगड, तोरणा, शिवनेरी, सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी आणि मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी सन 2022-23 मध्ये 7 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, राजर्षी छर्तपती शाहू महाराज स्मारक, महाराणी सईबाई स्मृतीस्थान विकास, संत जगनाडे महाराज स्मारकासाठी आर्थिक तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
महापुरूषांच्या शाळांचा विकासासाठी भरघोस निधी
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत ऐतिहासिक महत्वाच्या शाळांचा विकास करण्याच्या अनुषंगाने 10 शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महात्मा फुले यांची मूळगाव खानवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मगाव कागल, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेली पहिली शाळा, सातारा, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगांव वाटेगांव, ता. वाळवा, महर्षि धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगांव- मुरुड, जि. रत्नागिरी, साने गुरुजी यांचे जन्मगांव पालगड, ता. दापोली, जि. रत्नागिरी, सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव नायगांव, ता. खंडाळा, जि. सातारा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगांव मोझरी, ता. तिवसा, जि. अमरावती, संत गाडगेबाबा यांचे जन्मगांव शेंडगांव, ता. अंजनगांव सुर्जी, जि. अमरावती, क्रांतीसिंह नाना पाटील यांचे मूळगांव येडे मच्छिन्द्र, ता. वाळवा, जि. सांगली याठिकाणच्या गावातील शाळांना शैक्षणिक सुविधा सुधारणांसाठी प्रत्येकी 1 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हेही वाचा : Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्पात रोजगारासाठी मोठी घोषणा, १ लाख नोकऱ्यांची संधी