उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात आणि नेते मात्र गॅलरीमध्ये येऊन इकडे तिकडे पाहतात अशा शब्दात अजित पवारांनी राज ठकारेंवर हल्लाबोल केला आहे. राज ठाकरेंच्या भूमिका नेहमी बदलत राहिल्या आहेत. तसेच त्यांच्या भूमिकांमुळे राज्याचे आणि समाजाचे नेहमी नुकसानच झाले असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे. लाऊडस्पीकरबाबत निर्णय झाला तर संध्याकाळनंतर सभा घेणाऱ्यांचीसुद्धा पंचायत होईल असे अजित पवार म्हणाले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बोलणारे बोलतात, बोलणारे घरी राहतात, गॅलरीमधून इकडे तिकडे बघतात आणि बिचारे कार्यकर्ते मात्र तिकडे जाऊन कुठेतरी कायतरी करतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात. नोटीसा त्यांना आल्या आणि त्यांची धरपकड सुरु आहे. त्यामुळे त्यांनीसुद्धा काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत असे अजित पवार म्हणाले आहेत.
संविधान कायदा सगळ्यांना सारखे आहे. माध्यमांनी सगळं दाखवलं ते दाखवल्यानंतर कालपासून सुरु झाले साईबाबांची काकड आरती भोंग्यांवरुन बंद झाली, त्यानंतर विठ्ठलाची आरती बंद झाली. मी सुरुवातीपासून सांगत होतो, हे उद्या जर करायचे ठरवलं आपल्यावर पण येणार आहे.
दोन्ही सीपी, एसपी आणि अधिकाऱ्यांना घेऊन बैठक घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊडस्पीकर लावायचा त्याची परवानगी घ्यायची. त्याचा डेसिबलची मर्यादा किती असायला पाहिजे हे पण बंधनकारक आहे. जर त्याचे पालन करण्यात आले तर मोठ मोठ्या सभा सूर्यास्तानंतर घेणाऱ्यांचीपण पंचायत होईल. आवाज इतका वाढला कमी करा, म्हणजे हे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेण्यासारखे आहे. असे अजित पवार म्हणाले आहेत.
कायदा हातात घ्याल तर सहन करणार नाही
राज्यात जेवढी वेगवेगळ्या प्रकारची धार्मिक स्थळं आहेत त्याबाबत सगळ्यांना आदर आहे. तिथं जर गेलो तर नतमस्तक होतो, त्यांच्या धर्मानुसार ते गोष्टी करत असतात. मला ग्रामीण भागातील जागरण गोंधळ, हरिनाम सप्ताह याची आहे. आपल्याकडे ८-८ दिवस सप्ताह चालतो. ते रात्री उशीरा चालतात. कारण सगळे कामधंद्याला जाऊन आल्यावर येत असतात. त्यामुळे नियम लावायचे झाले तर सगळ्यांना लावावे लागणार आहेत. आम्हाला महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बघडू द्यायची नाही. जर कोणी चुकीचे वागत असेल तर कोणत्या पक्षाचा आणि कोणाचा समर्थक आहे. हे पाहिले जाणार नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचा असेल. तो जर कायद्याचे उल्लंघन करणार असेल तर आम्ही हे सहन करणार नाही. कोणी कितीही अल्टिमेटम दिले तरी सोडणार नाही अशा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
हेही वाचा : Raj Thackeray Grandson : राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा; ठेवलं ‘हे’ नाव