जळगाव : एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यात नकार दिला होता. त्यावेळी आम्ही सर्व आमदारांनी त्यांची समजूत काढली. आपण सत्तेत असले पाहिजे. कारण, हे सरकार येण्यामध्ये एकनाथ शिंदे नावाची खूप मोठी ताकद होती. आपल्या सरकारच्या काळात देवेंद्रभाऊ यांनी सुद्धा मोठे मन दाखवले होते. त्यामुळे आता त्यांच्या सरकारमध्ये आपण सुद्धा मोठेपणा दाखवला पाहिजे, असं त्यांना आम्ही बोललो, असा खुलासा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
जळगावच्या आव्हाने येथे मंत्री गुलाबराव पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी फटकेबाजी केली आहे.
हेही वाचा : ‘गरिबाला गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले’, झिरवाळांच्या विधानावर अजितदादा नाराज; म्हणाले, अशा पद्धतीचे…
गुलाबराव पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी आमदारांचा मान ठेवून उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं. मंत्री आणि पालकमंत्रिपदासाठी तीन जणांचे सरकार असल्यामुळे काही अडचणी आल्या. मंत्री होण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ज्येष्ठ आमदार होते, जे की तीन-तीन वेळ आमदार होते. जवळपास 40 आमदार असे आहेत, की ते तीन वेळ निवडून आले आहेत.”
“मंत्रिपदासाठी लॉबिंग करण्यासाठी मी कुठेही गेलो नाही. कारण, ज्या माणसाला पद द्यायचे असते, त्या माणसाला किती अडचणी असतात, ते आपल्याला माहित आहे. असे असतानाही तिसऱ्या वेळेस मंत्रिपदासाठी संधी मला मिळाली,” असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
“राज्यात माझे पहिले उदाहरण असेल की, उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये पाणीपुरवठा खाते होते. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सुद्धा पाणीपुरवठा खाते आणि आता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सुद्धा पाणीपुरवठा खाते मिळाले,” असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.