पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त पोस्टप्रकरणी घडलेल्या हिंसाचारात आयटी इंजिनअर मोहसीन शेख याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येत संशयित आरोपी असलेल्यांना पुणे सत्र न्यायालायने निर्दोष सोडलं आहे. त्यामुळे मोहसीन शेख याची हत्या नेमकी कोणी केली असा प्रश्न जमियतचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम जाहुरकर यांनी उपस्थित केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जून २०१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. यामुळे पुण्यात अनेक भागात हिंसाचार उफाळला होता. पिंपरी चिंचडवमध्ये संतप्त जमावाने पीएमपीएलच्या बसेस जाळल्या. हडपसरमध्येही जमावाकडून मोहसीन शेखची हत्या करण्यात आली. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंडय देसाई याच्यासह २० जणांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप ठेवण्यात होता. मात्र, पुणे सत्र न्यायालायने या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
याप्रकरणातील आरोपींना निर्दोष सोडण्यात आल्यानंतर जमियतचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम जाहुरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे याप्रकरणात उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालायतही दाद मागणार असल्याचं ते म्हणाले. पुणे सत्र न्यायालायने त्यांना निर्दोष मुक्त केल्याने मोहसीनची हत्या कुणी केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.