विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचं हे पहिलं अधिवेशन असून शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. काल संध्याकाळी भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या एका नेत्यावर कारवाई केली जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचे पडसाद आज पावसाळी अधिवेशनात उमटले आहेत. दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सवाल उपस्थित करत ईडी कारवाईची माहिती भाजप नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कशी मिळते, असं दानवेंनी म्हटलं आहे.
अंबादास दानवे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही यापूर्वी देखील अनेक वेळा विचारलं आहे की, भाजपच्या साध्या कार्यकर्त्याला तपास यंत्रणांच्या कारवाईंची माहिती कशी मिळते?, भाजप नेते सांगतात आणि नंतर कारवाया होतात. याचा अर्थ केंद्रातील भाजप सरकार तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचं मोहित कंबोज यांनी आपल्या केलेल्या ट्विटमधून स्पष्ट होतं आहे. गेल्या ५० दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता राज्यात सरकार आहे की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे, असं दानवे म्हणाले.
जे लोक शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत, त्यातूनच शिवसेना पक्षप्रमुखांनी प्रतोद आणि गटनेता निवडलेला असून आता त्यांनी जारी केलेल्या व्हिपचं पालन सर्व आमदारांना करावं लागणार आहे,ज्या आमदारांनी या व्हिपचं पालन केलं नाही, तर ती शिवसेना पक्षाविरोधात केलेली कृती समजली जाईल, असं दानवे म्हणाले.
हेही वाचा : भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ईडी कारवाईची माहिती कशी मिळते?, अंबादास दानवेंचा सवाल