मुंबई : अजितदादा क्या हुआ तेरा वादा, कायको इसको अंदर लिया, असे म्हणत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून प्रश्न उपस्थित केला होता. दिघोळेपासून संतोष देशमुखपर्यंतच्या हत्येचा हिशोब अजितदादांनी करावा. या हत्या कुणी केल्या? याचा मास्टरमाइंड कोण होता? हे उद्योग कुणी केले? हे तपासण्यासाठी बारामतीचे लोक परळी किंवा परभणीत पाठवा,” असेही सुरेश धस यांनी म्हटले होते. ज्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते संतापले आहेत. याच मुद्द्यावरून विधान परिषदेतील अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी धस यांना बैल म्हटले आहे. (Amol Mitkari called Suresh Dhas a bull, what exactly is the case?)
विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत अकाउंटवरून सुरेश धस यांच्याविरोधात पोस्ट केली आहे. त्यांनी ही पोस्ट भाजपा नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत आमदार सुरेश धस यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित केला आहे. मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “@Dev_Fadnavis जी आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काल परभणीमधील मूक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करून अजितदादांविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. तर सुरेश धस यांनी या प्रकरणाच्या माध्यमातून राजकीय हेतू साध्य करण्याचे काम करू नये, असे अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
श्री @Dev_Fadnavis जी आपल्या पक्षाचे आमदार श्री सुरेश धस यांनी काल परभणी मधील मुक मोर्चात क्या हुआ तेरा वादा अजितदादा अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 5, 2025
काय म्हणाले होते सुरेश धस?
अजितदादा क्या हुआ तेरा वाद, कायको असको अंदर लिया.. ये अंदर लैने जैसा नही है.. दिघोळेपासून संतोष देशमुखपर्यंतच्या हत्येचा हिशोब अजितदादांनी करावा. या हत्या कुणी केल्या? याचा मास्टरमाइंड कोण होता? हे उद्योग कुणी केले? हे तपासण्यासाठी बारामतीचे लोक परळी किंवा परभणीत पाठवा,” असे सुरेश धस यांनी म्हटले होते.
तर, “माझ्या पक्षाकडून मला मंत्रिपद मिळत नाही. त्याऐवजी बीडमधून प्रकाश सोळंके किंवा परभणीतून राजेश विटेकर यांना मंत्री करा. त्यांनाही जमत नसेल, तर मनोज कायंदे यांना मंत्री करा, असे अजितदादांना सांगितले होते. राजेश विटेकरांनी सगळ्यांसोबत जावे. आमचा जिल्हा राष्ट्रवादीकडून बिनमंत्र्याचा राहुद्या. अन्यथा लोक अजितदादांना क्या हुआ तेरा वादा, असा प्रश्न विचारतील,” असे म्हणत धस यांनी मुंडेंवर निशाणा साधला होता.